Mumbra Train Accident: रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याने दोन लोकलचे डबे एकमेकांच्या जवळ येऊन ही दुर्घटना घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडून कर्जतला आणि कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकलमधून आठ प्रवासी रुळांवर, तर पाच जण लोकलच्या डब्यांत पडले होते. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाल्यानंतर या दुर्घटनेचा तपास रेल्वेच्या सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपवण्यात आला. तपासासाठी एक पथकही स्थापन करण्यात आले. या पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून साक्षीदारांसह जखमींचे जबाब नोंदवले. या तपासाबरोबरच नेमका हा अपघात कशामुळे झाला, याविषयी रेल्वे पोलिसांनी ‘व्हीजेटीआय’कडून अभिप्राय मागवला होता.
फडणवीस सरकारचे 21 मोठे निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधी निर्णयांचा धडाका
‘व्हीजेटीआय’चा अहवाल आणि तपासाअंती रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार ‘सिनिअर सेक्शन इंजिनिअर’ समर यादव, ‘असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर’ विशाल डोळस आणि इतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०५, १२५ (अ), १२५ (ब), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे रुळांचे दुरुस्तीचे काम न केल्याने कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन गाड्यांचे डबे एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते. ५ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानक नंबर ४०/३०० ते ४०/०० दरम्यान रेल्वे रूळ क्रमांक चारचे रूळ बदण्यात आले. परंतु, वेल्डिंग करण्यात आलेली नव्हती. रूळ क्रमांक ४वरील सेक्शन २८ येथे एक रुळ खाली आणि एक वर होता, हे विशाल डोळस आणि समर यादव आणि इतरांना माहीत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून रेल्वे अधिकाऱ्यांवर निष्काळजीचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला असताना मध्य रेल्वेने सावध पवित्रा घेतला. ‘मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी केली असून, यामागील कारणे शोधली आहेत. या मार्गांवरील सेवा सुरळीत सुरू आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले. मात्र, गुन्ह्यामुळे राज्य-केंद्र यांच्यात वादाची चिन्हे आहेत.
Mahayuti Politics: महायुतीला तडे? सापत्न वागणूक मिळत असल्याची ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार
दोन लोकल जवळ कशा आल्या?
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानक येथे किमी क्रं. ४०-३०० ते ४०-००दरम्यान अपथ्रू रूळ चार येथील रूळ घासल्याने गाडीला धक्का जाणवत होता. ५ जून रोजी रुळ बदलण्यात आला. मात्र, तिथे वेल्डिंग करून रुळ व्यवस्थित करणे आवश्यक असताना वेल्डिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे एक रूळ खाली तर एक रूळ वर राहिल्याने गाडीला धक्का जाणवत होता. रूळ क्रमांक ४वरील गाडी रूळ क्रमांक ३वरील गाडीच्या दिशेने झुकली आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या अतिशय जवळ आल्या, असे तपासात उघड झाले. रेल्वे रूळ क्रमांक ३ आणि ४मधील अंतर ४ हजार २६५ मिमी आढळून आले आहे. अंतर कमी असल्याने आणि रुळांखालील खडी निघून गेल्याने दोन्ही गाड्या जवळ आल्या.
Uddhav Thackeray: …ही तर निवडणूक आयोगाची भुताटकी; मतदार नोंदणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंची टीका
दुर्घटनेची कारणे काय ?
-मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारलगतचा नाला भरल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचून रुळांखालील खडीही वाहून गेली होती. फलाट आणि रेल्वे रुळांखालील जमीन खचण्याबरोबरच दोन रूळ असमान पातळीवर असल्याचे आढळले.
-अभियंता विशाल डोळस, समर यादव यांनी ६ जून रोजी रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, ९ जून रोजी दुर्घटनेपर्यंत दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही.
-रेल्वे ‘एसओडी’नुसार रेल्वेगाडीचा वेग प्रतितास ६४.४ किमी असणे आवश्यक असूनही वेग प्रतितास ७५ किमी ठेवण्यात आला होता.
-रेल्वे रुळांखालील नाल्याची दुरुस्ती करण्याचे काम करण्याविषयी पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याने डोळस यांना कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

