• Mon. Mar 9th, 2026
    Raj Thackeray Satyacha Morcha : ‘मी पुरावे आणलेत, काढ तो कपडा’, राज ठाकरेंनी दुबार मतदारांचा पुरावाच दाखवला

    Mumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे पुरावेच दिले आहेत.

    राज ठाकरे सत्याचा मोर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेनं एल्गार पुकारला आहे. महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित आहेत. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय.

    राज ठाकरे काय म्हणाले?

    ‘हा राग आणि मोर्चा दिल्लीपर्यंत समजवण्याचा मोर्चा आहे. हा विषय तोच आहे, तो म्हणजे दुबार मतदाराचा. तुम्ही सर्व एवढ्या लांबून आलेत, मी सर्वांचे आभार मानतो. सगळेच बोलताय दुबार मतदार आहेत. भाजपचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. शिंदेंचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. मग निवडणूक घेण्याची घाई का?’ असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
    Maharashtra TimesMumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडी अन् मनसेचा सर्वात मोठा मोर्चा; विरोधकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

    ‘आधी मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर यश कुणाचं आणि अपयश कुणाचं हे सर्व आम्हाला मान्य आहे. लपून छपून कार्यक्रम कशासाठी करताय? काही मतदार जिथे राहतात तिथेही मतदान करताय आणि दुसरीकडे देखील मत देताय. असे लाखो लोकं आहेत जे दुबार मतदान करताय. लोकं बोलतील आकडे बोलून दाखवले आता पुरावे कुठेय?
    मी पुरावे देखील आणले आहेत. पाच वर्ष निवडणूक घेतली नाहीय. एक पैठणचा आमदार सांगतो मी बाहेरुन मतदार आणतो. मी २०१७ पासून ओरडून सांगतोय. निवडणूक आयोगामार्फत हा मतदारांचा अपमान आहे. मतदान कुठेही करा, पण मॅच आधीच फिक्स्ड आहे’, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांना आणि निवडणूक आयोगाला चांगलंच सुनावलं आहे.

    Maharashtra TimesSikandar Shaikh : पंजाबमध्ये सिकंदरला अटक, आजच होता वाढदिवस; वडील रशीद शेख यांचे मोठे विधान, त्याला…

    दरम्यान, मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्मिळ झालं होतं. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळा वाढल्यानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र उतरल्याने राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं. महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा