Marathwada Rain: मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून विभागातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सध्या पाऊस थांबलेला असला, तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे.
विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात पाणीसाठा पूर्ण झाला आहे. मराठवाड्याचे सरासरी पर्जन्यमान ७४८.५ मिलिमीटर आहे. सन २०२४मध्ये सरासरी ८८३ मिमी पाऊस झाला होता. यंदा पर्जन्यमानात वाढ होऊन ऑक्टोबर अखेरपर्यंत १०४१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा २९३ मिमी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत १५८ मिमी पाऊस अधिक झाला आहे.
निवडणूकघोषणा येत्या आठवड्यात; पहिल्या टप्प्यात नगरपालिका, 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबई महापालिकेची रणधुमाळी
नांदेडचे सरासरी पर्जन्यमान ८८८ मिलिमीटर असताना यंदा १२२० मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा कहर होता. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८५७ मिमी असताना यंदा ११७५.९ मिमी पाऊस झाला आहे. असमतोल पावसामुळे मराठवाड्याचे हवामान चक्र विस्कळित झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाळी वातावरण कायम आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस असल्याने रब्बी हंगामासाठी मशागत रखडली आहे. अतिवृष्टीमुळे नदी-ओढ्यात पुराचे पाणी वाहत आहे. आवक वाढल्यामुळे धरणातून विसर्ग सोडलेला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ‘जलयुक्त शिवार योजने’त बहुतांश नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण करण्यात आले आहे. अतिवृष्टीत पाण्याची आवक अधिक असल्याने पाणी नदीपात्राच्या बाहेर आले. पाण्याला अटकाव करणारे झाडेझुडपे योजनेअंतर्गत कामात काढण्यात आल्यामुळे पात्रालगत असलेली शेतजमीन वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. ही योजना पाण्याचे नियोजन करण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका विभागातील हवामान तज्ज्ञांनी ठेवला आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये देशभरात सर्वसाधारण (दीर्घकालीन सरासरीच्या ७७ ते १२३ टक्के) पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
‘सत्ता आली तर ग्रामदैवताला सोन्याचा मुकुट चढवेन’, अन् बाळासाहेबांनी शब्द पाळला, छ. संभाजीनगरच्या पहिल्या निवडणुकीतला चमत्कार
विभागातील पर्जन्यमान
जिल्हा पाऊस
छत्रपती संभाजीनगर —९३५.६
जालना —९४४.३
बीड —९८३.४
लातूर —१०३७.३
धाराशिव —१०३९
नांदेड —१२२०.६
परभणी —१०१५.५
हिंगोली —११७५.९
एकूण —१०४१.८
(सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)

