• Fri. Mar 6th, 2026

    सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद

    सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद

    “मी दररोज पत्रकार परिषद घेऊन नवनवे खुलासे करणार आहे. मी तुमच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. काय करायचं ते करा. मी तुम्हाला घाबरत नाही. ईडीची ऑर्डर नीट वाचली तर स्पष्टपणे लक्षात येतं की कोर्टाने सांगितलं आहे की, नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही आणि चौकशीच्या कक्षात का आणलं जात नाही? रणजित निंबाळकर यांच्या वकिलांनी अभ्यास करुन बोलावं. लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडेल असं राहू नये. एखाद्या मुलीने दोन मुलांसोबत चॅट केले तर तुम्हाला मारण्याचा अधिकार मिळतो का?”, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महिला आयोगाला सुनावलं.

    सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. या प्रकरणावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट 50 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा केला होता. तसेच नाईक निंबाळकर यांच्या वकिलांनीदेखील या प्रकरणावर भाष्य करत सुषमा अंधारे यांना इशारा दिला होता. यानंतर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावे सादर केले. त्यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा सादर केला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केला. यावेळी त्यांनी महिला आयोगावरही सडकून टीका केली.

    “नागटिळक आणि राजेशिंदे कुणाचे पीए आहेत ते सांगा. खासदार म्हणजे अमूक एक खासदार नाही. तर हे दोन अमूक लोकं कुणाचे पीए आहेत ते सांगा. खालचे दोन लोकं जे तिला तिच्या गावावरुन, आडनावावरुन, जात समूहावरुन तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पीएसआय अशा लोकांना चौकशीच्या कक्षात आणावं हा माझा कालही शब्द होता आणि आजही आहे. मी शब्द फिरवला नाही”, असं सुषमा अंधारे सुरुवातीला म्हणाल्या.

    “आता मी असं म्हटलं की, अनेक गुन्हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रभावाखाली दाखल होतात. असं म्हटल्यावर त्यांनी लगेच मानहानीचा दावा दाखल केला. मी काल एका मुलीचा फोटो दाखवला होता आणि तिला हजरही केलं होतं. खरंतर या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघींनी सुसाईट नोट लिहिली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संपर्क येतो का ते स्पष्ट होईल. त्यावेळी काय लिहिलं होतं ते लक्षात घ्या. हे पत्र महिला आयोगाला देखील दिलं आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे पत्र वाचू लागतात.

    पत्रात रणजितसिंह यांच्यावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हटलंय?

    “पप्पा, तुमची खूप आठवण येते. मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाहिलं. तुमची अवस्था डोळ्यांसमोरुन जात नाही. तुमच्यासारख्या खंबीर मनाच्या व्यक्तीच्या डोळ्यांत पाणी बघून आम्हाला हतबल झाल्यासारखं वाटत आहे. मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत. या महिन्यात काही दिवस मम्मीसोबत राहिलो त्यामुळे ती काय परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही.”

    “संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली. संतोष काका म्हणजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते. केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो. तुम्ही असं चुकीचं का करत आहात, असं नका करु, आम्हाला पप्पांशिवाय कुणी आधार नाही असं सांगत त्यांना केस माघार घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हाला म्हणाले, बाळ मी काही करु शकत नाही. आमच्यावर खासदार रणजितदादांचा खूप दबाव आहे. हे सुसाईट नोटमध्ये म्हटलं आहे. मी काल का नाव घेतलं याचे माझ्याकडे पुरावे आहेत. आमच्यावर खासदार रणजितदादांचा दबाव आहे हे मुलीने सुसाईट नोटमध्ये म्हटलं आहे. ही नोट खूप मोठी आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

    “दत्तू काका असं बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी आलो. तिथे पोहोचल्यावर बाळू कदम आले. आता या बाळू कदम याची ऑडिओ क्लिप मी ऐकवून दाखवते. संतोष काका आम्हाला बोलू दिलं नाही. लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले. तिथून आम्ही घरी आलो. संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने तुमच्यावर पहिल्यांदा केस केली होती तोच तो हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवलं जात आहे हे आम्हाला समजायला लागलं. खासदार रणजितदादा आणि तुमची चांगली मैत्री होती”, असं सुषमा अंधारे पत्र वाचतात.

    “मी हे चारपाणी पत्र वाचून तुमचा वेळ घेणार नाही. पण या पत्रात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कितीवेळा उल्लेख आला आहे हे पत्र वाचल्यावर आपल्याला कळेल. आता या सुसाईटनोटमध्ये ज्या मुलीने लिहिलं होतं ती मुलगी आयसीयूमध्ये होती. संपदा मुंडे ही मुलगी हाताला लागली नाही. पण ही मुलगी वाचली”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी यावेळी महिला आयोगाला पाठवलेलं देखील पत्र वाचून दाखवलं.

    सुषमा अंधारे यांचा महिला आयोगावर जोरदार निशाणा

    “या मुलीने सुसाईट नोट लिहिताना एक पत्र महिला आयोगाला लिहिलं. मला कमाल वाटते. खरंतर मला महिला आयोगावर आता काही बोलायचं नाही. राजकीय पुनर्वसनासाठी काही जण तिथे बसवले जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर फार बोलायची इच्छा नाही. पण आयोगाचं काम हे सक्षमीकरण, सरबलीकरण, समुपदेशन असतं. आयोगाचं काम प्रेस घेणं नाही”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

    “मी काल जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले. बाजूला पोलीस अधिकारी बसले आणि महिला आयोग पटापटा बोलायला लागला. त्यांनी जे उत्तरे दिली तेव्हा पीडितेच्या कॅरेक्टवर बोलणं योग्य होतं का? पोलीस यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांवर किंवा चॅटवर किती विश्वास ठेवावा? आयोगाला पत्रकार परिषद घेण्याचा नाद आहे, आयोगाला मुलींबद्दल एवढा कळवळा आहे तर तो वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न करताना महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे”, असं त्यांनी सांगितलं.

    हे पत्र 8 नोव्हेंबर 2022 चं आहे. या पत्रानुसार किती जण चौकशीच्या कक्षात येतात ते बघा. विषय – फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा गिरवीचे प्राधिकारण अधिकारी किरण डुकरे हे सर्व संगनमत करुन माझे वडील दिगंबर रोहिदास आगवणे, आई जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेष बुद्धीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांना त्रास देवून भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे 6 नोव्हेंबर 2022 ला मानसिक त्रास आणि नैराश्यामुळे आत्महत्येला सामोरी जात आहे“, असं पत्र अंधारेंनी वाचून दाखवलं.

    “वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्या प्रकरणात का पत्रकार परिषद घेतली नाही? भाजपचा माणूस वाचवण्यासाठी त्या मुलीच्या चारित्र्याची बदनामी करत असाल तर काय बोलायचं? सुनील तटकरेंना सांगायचं आहे माणसं आवरा. महिला आयोगाला कलंक फासू नका”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed