Kolhapur Accident News : कळंबा गावात पती-पत्नी बाळूमामा दर्शनावरुन परत घरी येताना अनर्थ घडला. पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी जखमी आहे. भरदिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पेट्रोल संपलं आणि भयंकर घडलं…
सतीश लक्ष्मण धोंडफोडे (वय 50, रा. आदिनाथनगर, कळंबा रोड, कोल्हापूर) आणि त्यांच्या पत्नी गीता सतीश धोंडफोडे हे दाम्पत्य सोमवारी सायंकाळी आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन रात्री नऊच्या सुमारास परतताना त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपलं. पुढे पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी पत्नीला रस्त्याच्या बाजूला उतरवून दुचाकी ढकलत दोघांनीही पेट्रोल पंपाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वळणावर रस्ता ओलांडताना कोल्हापूरहून गारगोटीकडे जाणाऱ्या राज्य परिवहनच्या एसटी बसने (क्र. MH09 FL 8132) मागून जोरदार धडक दिली. बसच्या पुढच्या चाकाखाली चिरडले गेल्याने सतीश धोंडफोडे यांचा जागीच मृत्यू झाला.
Pune Crime : पुण्यात दिवाळी पार्टीचा जल्लोष असताना आत गुपचूप….; पोलिसांनी छापा टाकला आणि भलतंच समोर, आता चौकशी सुरू
चालक आणि वाहक फरार
या अपघातानंतर बसचा चालक आणि वाहक घटनास्थळावरून फरार झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना माहिती देत जखमींना तात्काळ मदत केली. धोंडफोडे यांना रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पत्नी गीता या किरकोळ जखमी असून, त्यांना तीव्र मानसिक धक्का बसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?
केबल व्यावसायिक होते सतीश…
सतीश धोंडफोडे हे गेल्या तीन दशकांपासून स्थानिक केबल नेटवर्क व्यवसायाशी संबंधित होते. त्यांच्या निधनामुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, खाजगी नोकरी करणारा मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
त्रस्त नागरिकांची मागणी
सतीश त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र घोडके मळा परिसरात वेगावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. अशात मागील वर्षभरात या ठिकाणी चार जीव गेले असून हा ‘ब्लॅक स्पॉट’ बनत आहे. त्यामुळे घोडके मळा क्षेत्रातील वळण सरळ करावं, वेगमर्यादा चिन्हं बसवावीत आणि स्ट्रीटलाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

