• Sun. Mar 15th, 2026

    ‘तुम्ही चोरीचा मोबाईल वापरताय, परत करा’ पोलिसांचा फोन गेला अन् 76 चोरीचे मोबाईल मिळाले परत; सीईआयआर पोर्टलची कमाल

    ‘तुम्ही चोरीचा मोबाईल वापरताय, परत करा’ पोलिसांचा फोन गेला अन् 76 चोरीचे मोबाईल मिळाले परत; सीईआयआर पोर्टलची कमाल

    Kolhapur Police: कोल्हापूर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून तब्बल 76 चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत दिले, ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास वाढला आहे.

    सीईआयआर पोर्टलची कमाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करुन तब्बल 76 चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवले आहेत. त्यामुळे मोबाईल चोरी करणाऱ्या लोकांमध्ये एक जरब बसली असून पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत असून मूळ मालकांनी मोबाईल फोन परत मिळाल्याचा भरभरून आनंद व्यक्त केला.

    जुना राजवाडा पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलचा वापर करून चोरीला गेलेले 76 मोबाईल फोन परत मिळवले आहेत. या पोर्टलद्वारे चोरीचे आणि हरवलेले मोबाईल आयएमईआय नंबरद्वारे ट्रेस करून त्यांचे लोकेशन शोधले जाते. पोलिसांनी सध्याच्या संबंधित मोबाईल वापरकर्त्यांना फोन करून सावध केले की, ‘तुमच्याकडे असणारा मोबाईल हा चोरीचा आहे. मोबाईल कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जमा करा, अन्यथा पोलिसांची गाडी दारात येऊ शकते.’ त्यानंतर हे सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या कारवाईत 5 हजार रुपये किंमती पासून ते 1 लाख रुपये किंमतीपर्यंतचे मोबाईल मिळाले असून, एकूण 11 लाख 40 हजार रुपयांचे मोबाईल परत मिळाले आहेत.

    चोरीला गेलेले मोबाईल परराज्यातूनही सापडले
    चोरीचे मोबाईल केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह परराज्यातही विकले जात होते, असे कुरिअरने आलेल्या मोबाईलच्या शोधातून स्पष्ट झाले. पोलिसांचे फोन जातात काहींनी कुरियरद्वारे तर काहींनी स्वतः हजर होऊन त्यांच्याकडे असलेले मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे चोरीच्या मोबाईल विक्रीची साखळी तोडण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पाऊलाचे कौतुक होत आहे.

    मूळ मालकांचा दुहेरी आनंद
    मोबाईल चोरीला जाऊन मिळणार का? असा प्रश्न मोबाईल हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या नागरिकांच्या मनात घोळत होता, पण दिवाळीच्या मुहूर्तावर चोरीलेले किंवा हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मूळ मालकांची आनंदी भावना द्विगुणित झाली आहे. काही लोकांना एकापेक्षा अधिक मोबाइल परत मिळाल्याने ही घटना विशेष ठरली.

    पोलिसांचे प्रभावी विहंगावलोकन
    जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि अंमलदार नीलेश नाझरे यांनी सायबर पोलिसांसोबत एकसंधपणे हा उपक्रम राबवला आहे. त्यांनी चोरीचे मोबाईल स्वेच्छेने जमा करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवली. मोबाईल चोरीच्या विरोधात पुढाकार घेणाऱ्या या यशस्वी मोहीमेने चोरीच्या मोबाईलच्या वापरावर प्रभावी आळा बसल्याचे दिसून येते.

    मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश
    ही घटना मोबाईल वापरकर्त्यांसाठीही कडक इशारा आहे की, चोरी किंवा हरवलेले मोबाईल सापडू शकतो आणि त्यासाठी तंत्रज्ञानाला आधार देणाऱ्या पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. सीईआयआर पोर्टलच्या मदतीने चोरीविरोधात कडक कारवाई होऊ शकते, त्यामुळे मोबाइल खरेदी करताना विक्रेत्यांची माहिती नीट तपासणे आवश्यक आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा