Kolhapur Husband Wife Death: कोल्हापुरात शेतातील विहिरीत बुडून एका दाम्पत्याचा एकत्र अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याशिवाय दोन वेगवेगळ्या घटनेत दोन मुलांचाही बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, रंगराव रामचंद्र कांबळे (वय 53) आणि त्यांची पत्नी मनीषा रंगराव कांबळे (वय 45) हे दाम्पत्य करवीर तालुक्यात म्हालसवडे येथील आपल्या शेतात नियमित शेतीकामानिमित्त गेले होते. सायंकाळी जनावरांसाठी पाणी भरण्यासाठी गेले असताना मनीषा या त्यांच्याच टाका नावाच्या शेतातल्या विहिरीत पाय घसरून पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या रंगराव कांबळे यांचाही तोल गेला आणि तेही पाण्यात बुडाले. काही वेळानंतर विहिरीवर तरंगणारे पाण्याचे भांडे आणि चप्पल पाहून शेजाऱ्यांना संशय आला. गावातील युवकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह सीपीआर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
Buldhana News: दिवाळीसाठी वडिलांना हातभार लावण्याची लगबग, पण स्पीड ब्रेकरने केला घात, एकुलता एक लेक गेला
वारकरी संप्रदायाचे दाम्पत्य
रंगराव आणि मनीषा कांबळे हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. नवरात्र आणि दसऱ्याच्या सणात गावात त्यांना मानाचे स्थान होते. रंगराव कांबळे हे गावातील धार्मिक कार्यक्रमात दवंडी देण्याचे काम करत असत. त्यांच्या निधनामुळे म्हालसवडे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सून आणि एक नात असा परिवार आहे. मोठा मुलगा योगेश भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो, तर लहान रोहित खासगी नोकरी करतो.
कळंबा तलावात 13 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू
याच करवीर तालुक्यातील कळंबा तलाव परिसरात आणखी एक दुःखद घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या संग्राम कुमार काळे (वय 13, रा. कळंबा) या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संग्राम हा घरी कोणाला न कळवता तलावाकडे गेला होता. काही काळाने तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र त्याचा काहीच मागोवा लागला नाही. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह कळंबा तलावात तरंगताना आढळला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बाबांसोबत जाण्याचा हट्ट आणि चिमुकल्याचा मृत्यू
दरम्यान, कोल्हापुरातील आणखी एक दुःखद घटना वारणानगर येथे शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. स्विमिंग टँकच्या शेजारी असलेल्या चेंबरमध्ये पडल्याने शर्विल सुदर्शन पाटील (वय 5, रा. गणेश पार्क, कोडोली; मूळ गाव सातवे) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे त्याचे वडील सुदर्शन पाटील हे पोहायला जात असताना शर्विलने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरला होता. मुलाला ट्रॅकच्या बाजूला बसवून सुदर्शन हे पोहत असताना शर्विल खेळता खेळता शेजारच्या चेंबरकडे गेला आणि पाय घसरून पडला. पोहून बाहेर आल्यावर काही वेळानंतर तो न दिसल्याने सुदर्शन यांनी शोध घेतला असता तो चेंबरमध्ये आढळला. आजोबांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले, मात्र तेव्हाच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील घडलेल्या या तीन दुर्दैवी घटनांमुळे परिसरातील कुटुंब, मित्र परिवारांवर आणि नागरिकांवर शोककळा पसरली आहे. म्हालसवडे गावातील दाम्पत्याचा विहिरीत बुडून मृत्यू, वारणानगरमधील पाच वर्षीय बालकाचा अपघात आणि कळंबा तलावातील विद्यार्थ्याचा मृत्यू या तिन्ही घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

