• Mon. Mar 9th, 2026

    BMC कडून पहिल्यांदाच लॉटरीतून घरे देण्यास सुरुवात; मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद, आतापर्यंत किती जणांनी केली नोंदणी?

    BMC कडून पहिल्यांदाच लॉटरीतून घरे देण्यास सुरुवात; मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद, आतापर्यंत किती जणांनी केली नोंदणी?

    BMC House Scheme News: मुंबई महापालिकेने विकासकांकडून मिळालेल्या घरांची सोडत पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या घरांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी नोंदणी केली आहे.

    BMC कडून पहिल्यांदाच लॉटरीतून घरे देण्यास सुरुवात; मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई महानगरपालिकेला विकासकांकडून ताब्यात मिळालेल्या 426 घरांची पालिकेने म्हाडाप्रमाणे सोडत पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्प व अत्यल्प गटांना उपलब्ध केल्या जाणाऱ्या या घरांसाठी मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसादही दिला आहे. 16 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी 2 हजार 764 जणांनी नोंदणीही केली आहे. त्यापैकी 40 जणांनी अर्जही भरले आहेत.

    महापालिकेला यापूर्वी चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना 20 टक्के प्रिमियम विकासकाकडून मिळत होते. परंतु मुंबई महापालिकेने विकास नियंत्रण नियमावलीत नुकतेच बदल केले व प्रिमियमच्या बदल्यात घरे प्राप्त करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार नियम 15 अंतर्गंत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना महानगरपालिकेला 20 टक्के घरे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महानगरपालिकेला 426 घरे प्राप्त झाली असून त्याची विक्री सोडत पद्धतीने केली जात आहे. 16 ऑक्टोबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि ऑनलाइन अर्जविक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घरांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे.

    दरम्यान, आतापर्यंत 2 हजार 764 जणांनी नोंदणी केल्याची माहिती महापालिका प्रशासनातील सूत्रांनी दिली. यापैकी 40 जणांनी अर्ज भरला आहे आणि 19 जणांनी शुल्क अदा केले आहे. अर्जदारांना 14 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर अर्ज शुल्क व अनामत रक्कम 14 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजण्याच्या आत स्वीकारण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तसंच सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता पार पडेल. 14 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी पाहता अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आले. भांडुप, कांदिवली पूर्व व पश्चिम, भायखळा, कांजुरमार्ग, अंधेरी पूर्व मरोळ, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम पिरामल नगर, दहिसर येथील ही घरे आहेत. या घरांची किंमत 63 लाखांपासून ते 1 कोटीपर्यंत असणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा