Kolhapur Car Fell Couple Survived: महादेवाच्या दर्शनावरुन परतत असताना कार चारशे फूट खोल दरीत कोसळली. रात्रभर कुठलीही मदत न मिळाल्याने जोडपं या कारमध्ये अडकून पडलं. दैव बलवत्तर म्हणून हे जोडपं या अपघातात बचावलं आहे.
कोल्हापुरातील पाचगाव-प्रगती कॉलनी येथील दत्तात्रय रघुनाथ पवार (32) आणि त्यांची पत्नी अश्विनी (28) मारुती कार (MH 09 GU 5635) ने घरी जात होते. घाटातील एका वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यानं त्यांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे चुराडा झाला; मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी अवस्थेत जिवंत बचावले.
Chhatrapati Sambhajinagar: घर बांधायचं आहे, वडिलांना पैसे माग; तीन वर्ष त्रास सोसला, अखेर नको तेच घडलं, मन सुन्न करणारी कहाणी
अपघातानंतर रात्रभर मदतीअभावी दोघे दरीतच
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दोघे दाम्पत्य देवदर्शन करून परत येत होते त्यावेळी ही घटना घडली. मात्र, घडलेल्या या अपघातानंतर मोबाईल नेटवर्क नसल्यानं आणि अंधाराच्या कारणाने मदतीला कोणीही पोहोचू शकले नाही. संपूर्ण रात्र दरीमध्ये जखमी अवस्थेत मदतीसाठी हाक देत ते दोघेही तडफडत राहिले. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या स्थानिक तरुणांच्या कानावर दरीतून मदतीसाठीचा आवाज पडला. त्यांनी घाटातील अन्य तरुणांना बोलावले आणि एकमेकांच्या हाताला हात धरत, साखळी पद्धतीने दरीत उतरून जखमींना वर काढले.
वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे जीव वाचला
धाडसी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत पवार दाम्पत्याला अत्यंत खडतर परिस्थितीत दरीतून वर आणले. मात्र, त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती. तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना कोल्हापूर सी. पी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपस्थित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे; मात्र जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू आहेत.
‘बेपत्ता’ची तक्रार अन् अपघाताचा तपास
या अपघाता दरम्यान पवार कुटुंबीय घरी न पोहोचल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी करवीर पोलिसांत रात्रीच दत्तात्रय आणि अश्विनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. शोधमोहीमे दरम्यान सकाळी दरीत कार सापडल्याने अपघात स्पष्ट झाले. पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करीत आहेत.
घाटरस्त्याची दुरवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव
दरम्यान घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी स्पष्ट केलं की, सातेरी घाटमार्गावर संरक्षण कठडे नाहीत. त्यामुळे वारंवार अशा अपघाताच्या घटना घडतात. “प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित कठडे उभारावेत” अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. सातेरी महादेव देवस्थानामुळे या घाटावर प्रवासी व भाविकांची मोठी वर्दळ असते. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

