• Sun. Mar 8th, 2026
    सोलापुरात पूरपरिस्थिती कायम; सीना नदीत सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, गावांना सावधगिरीचा इशारा

    Solapur Flood: सीना कोळेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

    solapur flood news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सोलापूर: सोलापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. धाराशिव जिल्ह्यातही पाऊस बरसत असल्याने सीना नदीला पुन्हा पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    सीना नदीत सध्या चांदणी प्रकल्पातून ९ हजार ४२२, खासापुरीमधून २२ हजार ६६८, सीना कोळेगावमधून ६० हजार ५००; तर भोगावती नदीमधून २९ हजार ७०० असा एकूण एक लाख २२ हजार ३१० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
    Maharashtra Timesमराठवाड्यात हाहाकार! मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, 141 मंडळांत अतिवृष्टी, जनजीवन ठप्प
    उजनी धरणातून शनिवारी सांडव्यातून ९० हजार क्युसेक व विद्युतगृहातून १६०० क्युसेक विसर्ग असा एकूण ९१ हजार ६०० क्युसेक वेगाने भीमा नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे. भीमा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी असे, आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

    विदारक परिस्थिती
    उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी आणि पाकणी गावासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अत्यंत विदारक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला पूर आता ओसरला असला, तरी गावागावांतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रस्ते चिखलमय झाले असून अनेक घरांमध्ये अजूनही पाणी व चिखल साचलेला आहे. शेतात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    कृषिमंत्र्यांना पूरग्रस्तांनी घेरलं, भरणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं, काय घडलं?

    • पूर परिस्थितीतून बाहेर काढलेल्या नागरिकांना ७२ शिबिरांमधून सर्व सोयीसुविधा उपलब्ध.
    • पुरामुळे तीन लाख साठ हजार नागरिक बाधित झाले आहेत.
    • बाधित कुटुंबीयांना दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्वांना टँकरद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा देखील करण्यात येणार आहे. जिथे टैंकर जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी बोटीच्या साह्याने जारची व्यवस्था.
    • जिल्हास्तरावर आणि तालुकानिहाय मदत केंद्र निर्माण करण्यात आली असून, मदत देण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे.

      कर्जापायी वडिलांची व्यथा पहावेना, लेकीने सांगितली आपबीती, बार्शीतील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

    साडेतीन लाख हेक्टरचे नुकसान
    जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. चार हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरित करण्यात आले आहे; तर एकाचा मृत्यू झाला आहे. बाधित नागरिकांना आवश्यक असलेली सर्व मदत प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा