Marathwada Rain Update: गेल्या २४ तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत विभागात सरासरी ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ७५.६ मिमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू असून, बहुतांश भागांत पुराचे संकट निर्माण झाले आहे. विभागात शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पिके पाण्यात बुडाली असून, काही गावांना पाण्याचा वेढा आहे. पुरात अडकलेल्या ग्रामस्थांची ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी आणि स्थानिक प्रशासनाने सुटका केली. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमी आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम तालुक्यांना पावसाने झोडपले असून, गंगाखेड-पालम महामार्ग ठप्प झाला होता.
ऐन दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? 13 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, काय आहेत प्रमुख मागण्या?
धाराशिव ५४.५, हिंगोली ६६.२, परभणी ५८.१, नांदेड ५१.३, बीड ४१.२, जालना २.५ आणि छत्रपती संभाजीनगर ०.८ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. विभागातील तब्बल १४१ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील हडोळती आणि बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (१६३.५० मिमी) मंडळांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बंधारे, तलाव ओसंडून वाहत असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, औसा, तुळजापूर, अनाळा, सोनारी, अंभी मंडळात मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी, वाजेगाव, सगरोळी या मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील माकणी-चोबळी, थोडगा-मोघा, निलंगा-कासार शिरसी, उदगीर-देगलूर, रेणापूर-कामखेडा या रस्त्यांसह ५६ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रस्त्यांवर व पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. अतिवृष्टीमुळे भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गावांत पुराचे संकट ओढवले आहे. शनिवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शिरलेल्या गावांचा आढावा जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांनी घेतला. एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar: रस्तेकामात आपलं घर जाणार… भीतीने तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन; चिकलठाण्यात चक्का जाम आंदोलन
दरम्यान, हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर केली. धाराशिव जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरणातून सायंकाळी ८० हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
पुरात अडकले नागरिक
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चाकूर नगरपंचायतीच्या वतीने चाकूर शहरात घरामध्ये पाणी शिरलेल्या २० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील काम सुरू असलेल्या चिलखा बॅरेजवर जलसंपदा विभागाचे तीन मजूर अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आले.
भय इथले संपत नाही, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, हजार जणांचे स्थलांतर
सैन्यदलाकडून मदत
हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे उद्भवलेल्या छत्रपती संभाजीनगरातून लष्कराची तुकडी पाचारण करण्यात आली. मेजर कमाल तुकडीचे नेतृत्व करीत आहेत. हिंगोली-पुसद मार्गावरील वाहतूक बंद आहे. परळी-परभणी रेल्वे मार्गही पावसामुळे बंद आहे.
नांदेड शहरात पाणी
गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे. विष्णुपुरीचे प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील खडकपुरा, दुल्हेशाह, रहेमाननगर, जी. एम. कॉलनी, गाडीपुरा, कालापूल परिसर, गंगाचाळ, भीमघाट, बिलालनगर, पाकीजानगर, शंकरनगर या भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा
