भाजपचा मुकाबला करण्यात इंडिया आघाडी अपयशी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवत इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र आधी ठोस कार्यक्रमाचा अभाव आणि नंतर निवडणूक येता-येता या आघाडीतील काही महत्त्वाचे पक्ष काँग्रेसपासून वेगळे झाल्याने या आघाडीला निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही. परिणामी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. निवडणुकीतील पराभवानंतर इंडिया आघाडीतील मतभेद आणखी तीव्र झाले आणि ममता बॅनर्जींसह विविध नेत्यांनी जाहीरपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या नावाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं. मात्र कालांतराने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी या राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडली आणि या दोन्ही पक्षांतील मोठा गट भाजपसोबत सत्तेत जाऊन बसला. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी खिळखिळी झालेली असताना राज्यातही महाविकास आघाडीची स्थिती नाजूक झाली.
काँग्रेसमधून बंड, नेत्यांनी स्थापन केलेल्या प्रादेशिक पक्षांची स्थिती काय?
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या मतभेदांना कंटाळून काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षापासून फारकत घेत आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षांची स्थापना केली. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस, शरद पवारांच्या नेतृ्त्वाखालील राष्ट्र्वादी, जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृ्त्वाखालील वायएसआर काँग्रेस अशी काही ठळक उदाहरणं आहेत. मात्र मागील काही वर्षांत या सर्वच पक्षांची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसत आहे. यातील बहुतांश पक्षांनी आपआपल्या राज्यातील सत्ता गमावल्याचं पाहायला मिळतं.
कोणत्या पक्षाची स्थिती काय?
तृणमूल काँग्रेस
लोकसभा – २९ खासदार
राज्यसभा – १३ खासदार
आमदार – ८०
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
लोकसभा – ८ खासदार
राज्यसभा – २ खासदार
आमदार – १० खासदार
वायएसआर काँग्रेस
लोकसभा – ४ खासदार
राज्यसभा – ७ खासदार
आमदार – ११
पीडीपी
लोकसभा – ०
राज्यसभा – ०
आमदार – ३
एनआर काँग्रेस
लोकसभा – ०
राज्यसभा – ०
आमदार – १०
इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी का होतायत प्रयत्न, आघाडीचं भवितव्य काय?
इंडिया आघाडीबाबत सध्या राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आम्ही राजकीय विश्लेषक अभिजीत ब्रह्मनाथकर यांचे मत जाणून घेतले. यावर बोलताना ते म्हणाले की, “भाजप सध्या देशातील १८ पेक्षा जास्त राज्यात स्वबळावर सत्तेत असून ५ राज्यांत मित्रपक्षांच्या साथीने सत्तेत आहे. अशा स्थितीत भाजपविरोधात २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरताना एकजूट असण्याची गरज विरोधकांनी ओळखली आहे. भाजपविरोधात लढताना काँग्रेस मजबूत असेल तरच विरोधकांच्या आघाडीचा निभाव लागेल, ही गरज ओळखून जुन्या नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करायला हवी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. हा अस्तित्वाचा प्रयत्न असल्यानेच विरोधकांकडून एकजूट दाखवली जात आहे,” असं ब्रह्मनाथकर यांनी म्हटलं.
“नरेंद्र मोदींच्या समोर समर्थ पर्याय देण्यासाठी आपण एकवटलो तरंच २०२९ ची लढाई लढली जाऊ शकते, हे विरोधकांना उमगलं आहे. त्याच पर्यायावर विरोधक काम करत असून इंडिया आघाडीचं भवितव्य हे त्यांच्या जागावाटप आणि एकीवर अवलंबून आहे. ते जर भांडत राहिले तर जे २०२४ झालं तेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत होईल,” असा अंदाजही अभिजीत ब्रह्मनाथकर यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, एकीकडे इंडिया आघाडीचं बळकटीकरण आणि दुसरीकडे सोडून गेलेल्या नेत्यांची घरवापसी, अशी दुहेरी कसरत आगामी काळात काँग्रेसला करावी लागणार आहे. या प्रयत्नात काँग्रेसला यश येतं की भाजप पुन्हा धोबीपछाड देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.