• Sat. Jun 13th, 2026

    Nashik Crime : मी नांदणार नाही…! लव्ह मॅरेज केल्यानंतर वडिलांचा मृत्यू, मुलगी माहेरी परतली, मध्यस्थी करणाऱ्याचे न्यायालयाबाहेर अपहरण

    Nashik Crime : मी नांदणार नाही…! लव्ह मॅरेज केल्यानंतर वडिलांचा मृत्यू, मुलगी माहेरी परतली, मध्यस्थी करणाऱ्याचे न्यायालयाबाहेर अपहरण

    Nashik Kidnapping Case : नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर एका व्यक्तीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाहानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय असल्याने मध्यस्थी करणाऱ्या मंगेश उगले यांचे अपहरण करण्यात आले. प्रकरण काय आहे जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, नाशिक : प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह केल्यानंतर तरुणीच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय घेत विवाहात मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तिचे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेरून अपहरण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अपहृत व्यक्तिने सरकारवाडा पोलिसांत संशयित महिलेसह तिचे नातलग आणि एका महिला वकिलाविरुद्ध तक्रार दिली असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांत तळेगाव-वणीतील रहिवासी मंगेश निवृत्ती उगले (वय ४०) यांच्या फिर्यादीनुसार, अक्षय सुरेश सरोदे, प्रशांत मोरे, शरद झाल्टे, शरद सरोदे, यमुना लिंगायत, वकील कविता पाटील, प्राजक्ता सुरेश सरोदे उर्फ प्राजक्ता यशवंत तिडके यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद आहे.

    नेमके काय घडलं?

    उगलेचा आतेभाऊ यशवंत तिडके हा त्यांच्या घरी नेहमी येत होता, त्यादरम्यान शेजारील प्राजक्ता सरोदेशी त्याची ओळख झाली. त्यांनी २० जानेवारीला आंतरजातीय प्रेमविवाह केला. दोन महिन्यांपूर्वी प्राजक्ताचे वडील सुरेश यांचे निधन झाले. तिडके व प्राजक्ताच्या विवाहात यशवंतचा मामेभाऊ मंगेशने मध्यस्ती केली होती. या विवाहामुळे सुरेश यांचे निधन झाल्याचा प्राजक्तांच्या नातलगांचा समज आहे. त्यातच विवाहाच्या चार दिवसांनी प्राजक्ता पतीपासून स्वतंत्र राहून माहेरी वास्तव्यास आली. त्यामुळे यशवंतने जिल्हा न्यायालयात पत्नी नांदण्यासाठी दावा दाखल केला. गुरुवारी (दि. १८) ओझर येथून यशवंत नाशिक न्यायालयात पोहोचला.
    Maharashtra Timesभाविकांसाठी आनंदाची बातमी! नवरात्रीत सप्तश्रृंग गडावर धावणार 320 जादा ST बसेस, कसे असेल नियोजन?
    तेव्हा दहावा मैल परिसरात यशवंत भेटला. दुपारी तीनच्या सुमारास यशवंत सुनावणीसाठी न्यायालयात गेला, तेव्हा यशवंतची पत्नी प्राजक्ता, तिचा भाऊ अक्षय सरोदे, मावस भाऊ प्रशांत मोरे, मामा शरद झाल्टे, मामेभाऊ शरद सरोदे, प्राजक्ताची आत्या यमुना लिंगायत तेथे आले. शरद सरोदे या संशयिताने मंगेशला ‘प्राजक्ताचा विवाह का लावून दिला’, अशी विचारणा करीत मारहाण केली. मंगेशने समजावण्याचा प्रयत्न केल्यावर ‘यशवंतला केस मागे घ्यायला सांग’, असा दम भरला.
    Maharashtra Timesउत्तर महाराष्ट्राला ‘परतीचा’ तडाखा; ५४ पैकी १६ तालुक्यांत पावसाचा कहर

    ‘आमच्या बाजूने साक्ष दे’

    संशयित अक्षय सरोदे व प्रशांत मोरे यांनी मंगेश यांना ‘तू विवाह लावून दिलाच नाही तर, आमच्या बाजूने तशी साक्ष दे व लिहून दे’, असे सांगत सीबीएस येथील भुयारी मार्गाजवळून संशयित अॅड. कविता पाटील यांच्या कक्षात नेले. कविता यांनी स्टॅम्प पेपरवर मजकूर टाइप करून फोटो चिकटवून सही व अंगठा देण्यास सांगितले, नकार दिला असता पाटील व लिंगायत यांनी जबरीने सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर कारमध्ये जबरीने बसवून झाल्टे, सरोदे, मोरे यांनी त्याचे अपहरण करीत वणीत नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा