Mono Rail Suspend : मुंबईतील मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याने एमएमआरडीए प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चेंबूर ते सात रस्ता दरम्यान धावणारी मोनोरेल सेवा २० सप्टेंबरपासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिक सुधारणा करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
मुंबईतील मोनोरेल सेवेमध्ये अनेकदा अडथळे निर्माण झाले आहेत. नुकत्याच १९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसानंतर गंभीर दुर्घटना घडली. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल थांबली आणि तब्बल ५८२ हून अधिक प्रवासी दोन ते तीन तास अडकून पडले. अखेरीस अग्निशमन दलाच्या पथकाने धाडसी प्रयत्न करून प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे नगर स्थानकातही आणखी एक मोनो अडकून पडली, ज्यामध्ये जवळपास २०० प्रवासी अडकले. त्यांचीही सुखरूपपणे सुटका करण्यात आली.
Mumbai AC local Train : लोकलचे मालडब्बेही AC होणार, स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणेचं नियोजन; कशी असणार सुविधा?
मोनोरेल ही देशातील एकमेव प्रणाली असून ती संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर या १९.७४ किलोमीटरच्या मार्गावर धावत असते. मात्र गेल्या काही वर्षांत वारंवार होणारे अपघात आणि बिघाडांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोनोरेल सेवा थांबवून भविष्यातील सुरक्षित आणि सुरळीत संचालनासाठी तांत्रिक सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत.
या सुधारणा काळात मोनोरेल गाड्यांची डागडुजी केली जाणार असून नव्या गाड्यांचे परिचलन अधिक सुरक्षितपणे होण्यासाठी सिग्नलिंग प्रणालीतही सुधारणा केली जात आहे. विशेष म्हणजे, हैदराबादमध्ये विकसित करण्यात आलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम (CBTC) प्रथमच या मार्गावर बसवली जाणार आहे.
तसेच, ३२ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवली गेली असून त्यांची चाचणी सध्या सुरू आहे. प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी २६० वायफाय ऍक्सेस पॉइंट, ५०० RFID टॅग्स, ९० ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि मल्टिपल WATC यंत्रणा आधीच कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय वेसाईड सिग्नलिंगची कामे पूर्ण झाली असून एकात्मिक तपासणी टप्प्यावर आली आहेत.
मुंबईकरांसाठी मोनोरेल हा महत्त्वाचा वाहतुकीचा पर्याय ठरू शकतो, मात्र त्यासाठी सुरक्षितता आणि विश्वासार्हता अत्यावश्यक आहे. वारंवार होणाऱ्या बिघाडानंतर आता घेतली जाणारी ही पावले प्रवाशांना अधिक सुरक्षित, निर्धोक आणि वेळेवर सेवा देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

