Maharashtra Politics : मावळमध्ये अजित पवारांना धक्का देत अपक्ष निवडणूक लढवलेले बापू भेगडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत
2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मावळ पॅटर्नची मोठी चर्चा झाली होती. यामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण बंडखोरी करत असल्याचं सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच नेते बापू भेगडे यांनी बंडखोरी केली होती. बापू भेगडे यांनी सुनील शेळके यांच्याविरोधात मावळमधून निवडणूकसुद्धा लढवली होती. मात्र बापू भेगडे यांच्या बंडखोरीच्या मागे भारतीय जनता पक्षाचीच ताकद असल्याची टीका त्यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तेच बापू भेगडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत झालेली बंडखोरी भाजप पुरस्कृत होती का हा प्रश्न आता उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.
बापू भेगडे आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशात भाजपचे नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे मावळ मधील कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. 2019 च्या निवडणुकीत सुनील शेळके यांनी तत्कालीन भाजप आमदार बाळा भेगडे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये कट्टर राजकीय शत्रुत्व पाहायला मिळतं.
Uddhav Thackeray : तातडीने माहिती काढा आणि मला कळवा; ‘मातोश्री’वरील हायव्होल्टेज बैठकीत उद्धव ठाकरेंचा एक प्रश्न, म्हणाले नंतर घोळ व्हायला नको…
त्यामुळेच आता बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मावळात मोठे खिंडार पाडण्यात आले आहे. महायुतीच्या विरोधात काम केलं म्हणून आधीच पक्षातून निलंबित असणारे बापू भेगडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव वायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून कमळ हाती घेणार आहेत. बापू भेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मावळमध्ये भाजपची ताकद निश्चित वाढणार आहे.
Haresh Keni : कान भरले की स्पष्टीकरण मागायचे, नाराज नेत्याचा भाजपला रामराम, फक्त दोन ओळींचा राजीनामा पाठवला
बापू भेगडे यांचे मावळमध्ये मोठ्या प्रमाणात संघटन आहे त्यासोबतच संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच सुद्धा मोठं जाळं बापू भेगडे यांनी उभा केल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने केलेली ही मोठी खेळी असल्याची चर्चा सध्या मावळच्या राजकारणात सुरू आहे.

