• Sat. Mar 7th, 2026
    Nitin Gadkari : ‘…तरच शेतकरी आत्महत्या थांबतील’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मोठे विधान

    Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील शेती आणि पाण्याची समस्या यावर भाष्य केले. योग्य नियोजनाने शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवता येईल, असे ते म्हणाले. ‘नाम’ संस्थेच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे : भारतात ‘महाराष्ट्रात आणि शेतीसाठीचे पाणी हीच मुख्य समस्या आहे. मुबलक पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. देशात कुठेही पाण्याची कमतरता नाही. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावीच ही समस्या वाढली आहे,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘राज्यातील सिंचनाचे प्रमाण ६५ टक्क्यांवर गेल्यास, शेतीला दूधदुभत्याची जोड मिळाल्यास शेतकरी आत्महत्या नक्की थांबतील,’ असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

    गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व सचिव प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आदी उपस्थित होते.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis : ‘मराठा आणि ओबीसी नेते वास्तविकता समोर आणणार नाहीत, पण सरकार…’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
    ‘वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे समाजातील संवेदनशील व्यक्ती अस्वस्थ झाल्या. त्यातूनच ‘नाम फाउंडेशन’ सारख्या संस्था सुरू झाल्या. त्यांनी प्रचंड काम केले. समस्यांची व त्यावरील उपायांची जाण असलेल्या, संवेदनशील व्यक्तींची समाजाला गरज आहे. त्यासाठी पैसा द्यायलाही लोक पुढे येतात,’ असे गडकरी म्हणाले.
    Maharashtra Timesआरक्षणाबाबत मोठी बातमी: सरकारविरोधात दोन मोर्चे काढणार, काँग्रेस नेत्याकडून तारखेची घोषणा, भुजबळांनाही जाहीर ऑफर

    ‘पाण्याचेही राजकारण’

    ‘योग्य नियोजनाअभावी नद्यांचे बरेचसे पाणी वाहून समुद्राला मिळते; पूर येतो. योग्य पद्धतीने जलसंवर्धन केले, तर मोठ्या धरणांची गरजच नाही. महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण ६५ टक्क्यांवर गेल्यास व दूधदुभत्याची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आत्महत्या थांबतील,’ असे गडकरी म्हणाले, ‘देशात पाण्याचेही राजकारण केले जाते, असे सांगतानाच जलशक्तीमंत्री असताना मी राज्याराज्यांतील २४पैकी १७ तंटे मिटवल्याचा दावा गडकरींनी केला.
    Maharashtra TimesAjit Pawar : एक मिनिटं…! ”आम्ही राहायचं की नाही’; त्रस्त पुणेकर महिलेचा थेट अजित पवारांनाच सल्ला, दादा म्हणाले…

    ‘महिलांना रोजगार हवा’

    ‘महिलांसाठी अर्थ वेळ कामाचे प्रारूप तयार करून अधिकाधिक महिलांना रोजगार देऊन स्वबळावर उभे करणे गरजेचे आहे. सामाजिक प्रयोगांना सरकारची जोड मिळणे आवश्यक आहे,’ असे पाटील म्हणाले. ‘नाम फाउंडेशन’चे कामच त्यांच्या यशाची पावती आहे. सरकारसोबतच्या योजनांमधूनही आम्ही ‘नाम फाउंडेशन’ला सोबत घेतले आहे,’ असे सामंत म्हणाले. अनासपुरे यांनी प्रास्ताविकात ‘नाम फाउंडेशन’च्या कार्याचा आढावा घेतला. पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.

    गडकरी म्हणाले…

    • मी ८० ते ९० टक्के सामाजिक काम करतो, राजकारण करतच नाही.
    • जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचाराची गरजच नसते.
    • आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहून इतरांना सोबत घ्यावे.

    सरकारचा हात नको रे बाबा’

    ‘मी असे बोलणे योग्य नाही; तरीही सांगतो,’ असे म्हणून गडकरी म्हणाले, ‘मी प्रयोग करतो; पण पहिल्यापासून सरकारला दूर ठेवतो. सरकारची मदत घेत नाही; कारण सरकारचा हात लागला, की समस्या सुरू होतात. सरकारी व्यवस्थाच अशी आहे, की सरकार आले, की समस्याही येतात.’ यावर सभागृहात एकच हशा पिकला.

    ‘शेतीत प्रयोगांची गरज’

    ‘गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते, यावर माझा विश्वास नाही. येत्या काळात शेतीत तंत्रज्ञान आणून वेगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. ते प्रयोग यशस्वी झाले आहेत. २२ लाख कोटींचे जीवाश्म इंधन आपण राज्यात आयात करतो. इथेनॉल निर्मिती व वापर सुरू केल्यानेच पश्चिम महाराष्ट्रातील दिवाळखोरीत येऊ घातलेले ९० टक्के साखर कारखाने वाचले. येत्या काळात शेतकऱ्याला ऊर्जादाता, अन्नदाता, इंधनदाता, बिटुमिनदाता, हवाई इंधनदाता, हायड्रोजनदाता करता येऊ शकते. त्यातून गावे समृद्ध होतील, असेही गडकरी म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा