Chhatrapati Sambhaji Nagar News : छ. संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. घरी फोनवर सांगितलं एका नंबरवरून फोन येईल तो घेऊ नका, नंतर एका अनोळखी नंबरवरून फोन आले. दुसऱ्या दिवशी तिचे जीवन संपवल्याची बातमी आणि घरच्यांची माफी मागितली, तरूणीसोबत काय घडलं? जाणून घ्या.
निकिता रवींद्र पवार (वय २२) वाळुंज पोही तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, निकिताने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलं होतं. दीड महिन्यांपूर्वी तीन शहरात नोकरीच्या निमित्ताने आली होती. अविष्कार कॉलनी मध्ये भाड्याच्या खोलीमध्ये दोन मैत्रिणींसह ती राहत होती. ती एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. नुकतंच काही दिवसांपूर्वी निकिताच्या दोन्ही मैत्रिणी गावी गेल्या होत्या. निकिता रूमवर एकटीच होती. सायंकाळी शेजारी राहणाऱ्या मैत्रिणी मेसवर जेवणासाठी निकिताला बोलवायला गेल्या. मात्र खोलीतून प्रतिसाद आला नाही. मैत्रिणी खिडकीतून बघितले असता निकिताने गळफास घेतला होता. हा संपूर्ण प्रकार बघून घाबरलेल्या मैत्रिणींनी ही माहिती घरमालकाला दिली. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने निकिताचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी निकिताला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूचे नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार तेलुरे करीत आहेत.
२५ वेळा आलेला तो अनोळखी नंबर कोणाचा?
आत्महत्येच्या एक दिवस अगोदर निकिताने कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं नातेवाईकांना लक्षात आलं. तिने कुटुंबीयांना सांगितले तुमच्या मोबाईलवर एक कॉल येईल, तो ब्लॉक लिस्ट मध्ये टाका, त्याचा कॉल घेऊ नका असे तिने सांगितले. हे बोलणं झाल्यानंतर कुटुंबीयांच्या नंबर वर २५ वेळा अनोळखी नंबर वरून कॉल आला असल्याचं मृत निकिताच्या भावाने सांगितले. दरम्यान निकिताने असं का सांगितलं? निकिताला कोणी ब्लॅकमेल करत होतं का? अनोळखी नंबर कोणाचा? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला असून तिच्या कॉल डिटेल वरून पोलीस तपास करीत आहेत.

