• Sun. Jun 14th, 2026
    मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर वावगे काय? मिलिंद देवरांच्या मागणीवर भाजपच्या बड्या नेत्याचा सवाल

    शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आंदोलनासंबंधित मागणी केली. त्यावर भाजपच्या बड्या नेत्याने सवाल उपस्थित केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विजयसिंह होलम, अहिल्यानगर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मंत्री विखे पाटील यांचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी विखे पाटील यांनी मिलिंद देवरा यांनी मुंबईतील आंदोलनासंबंधी लिहिलेल्या प्रत्रावर सवाल उपस्थित केला.

    देवरांच्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की,मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्र्यांनीच दिलगीरी व्यक्त केली आहे.आंदोलनात मुंबई महापालिका पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले. मराठा समाजाच्या काही भावना होत्या त्यासाठी रस्त्यावर यायचे नाही तर कुठे यायचे, मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर त्यात वावगे काय ॽअसा सवाल उपस्थित केला. देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात त्यांनी दक्षिण मुंबईतील कोणत्याही ठिकाणी आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी विनंती केल्याचे दिसते. या मागणीवर विरोधी पक्षातून टीका होत असतानाच आता सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनीही सवाल उपस्थित केला आहे.

    नगरमध्ये मराठा आंदोलनासंबंधी माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता जशी वाढत होती तेव्हाच उपसमीतीने बैठका घेवून जरांगे पाटलांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. न्यायमूर्ती शिंदे समितीला विश्वासात घेवून राज्याच्या महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेला मसूदा आंदोलकांच्या हाती ठेवला.यामधून निश्चित आंदोलकांचे समाधान होईल असा आत्मविश्वास मनामध्ये होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला विश्वास यामुळे सार्थ करता आला.झालेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील बांधवाचे स्वप्न पूर्ण करता आल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. झालेल्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांनाच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

    झालेल्या निर्णयाबद्दल सरकारची केव्हाही चर्चा करण्याची तयारी आहे. मराठा समाजातील काही नेत्यानाही या व्यासपीठावर येवून आंदोलनात आपली भूमिका मांडण्याची संधी होती.केवळ बंद खोलीतून भूमिका व्यक्त करून दिशाभूल न करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांना केले.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा