• Fri. Mar 6th, 2026
    मुंबई-नांदेड प्रवास आता सुस्साट! सुपरफास्ट वंदे भारत सेवेत येणार
    नांदेड 
    बहूप्रतिक्षेत असलेल्या नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. २८ ऑगस्टपासून ही रेल्वे दररोज सकाळी ५ वाजता हूजूर साहिब नांदेड रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी २ वाजून २५ मिनिटाला पोहोचणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. नांदेड ते मुंबईपर्यंतचा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास ९ तास २५ मिनिट असणार आहे.वंदे भारत एक्सप्रेस ही पूर्वी मुंबई जालनापर्यंत धावत होती. नांदेडहून देखील वंदे भारत रेल्वे सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. अखेर मुंबई ते जालनापर्यंत धावणाऱ्या या रेल्वेचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे नांदेड आणि मुंबईमधील ६१० किमीचे अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे.

    या एक्सप्रेसमध्ये २० डब्बे (एक्झिक्युटिव्ह-०२, चेअर कार १८) असतील. तसेच एकत्रित आसन क्षमता १४४० असणार आहे. शिवाय ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, आलिशान इंटीरियर, स्पर्शमुक्त सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित वाचन दिवे आणि हाइड रोलर ब्लाइंड्स, चांगले उष्णता वायुवीजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यूव्ही दिव्यासह एअर कंडिशनिंग सिस्टम अशा अत्याधुनिक प्रवासी सुविधा असणार आहे. नांदेडहून बुधवार अणि मुंबईहून गुरुवार वगळता आठवड्यातून ६ दिवस धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान मंगळवारी शुभारंभानंतर सकाळी वाजता ११ वाजून २० मिनिटाला वंदे भारत रेल्वे मुंबईला रवाना होणार आहे.

    पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला मिळणार चालना

    वंदे भारत ट्रेनमुळे अनेक शहरांना जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी सोबत तीर्थयात्रेच्या आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. नांदेड येथील विश्व प्रसिध्द सचखंड साहिब गुरुद्वारा, जालन्यातील राजूर गणपती मंदिर, तसेच छत्रपती संभाजी नगरजवळील भगवान शिवाचे घृणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि मनमाडजवळील शिर्डी ही महत्त्वाची तीर्थस्थळे सेमी-हाय स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडली जातील ज्यामुळे यात्रेकरूंना अधिक आराम आणि सुविधा मिळेल असा विश्वास रेल्वे विभागाने व्यक्त केला आहे.

    २८ ऑगस्टपासून असे राहिल वेळापत्रक

    नांदेडहून ५ वाजता निघणार, ५.४० वाजता परभणी , ७.२० वाजता जालना, ८.१३ वाजता छत्रपती संभाजीनगर, ९.५८ वाजता मनमाड जंक्शन , ११ वाजता नाशिक रोड, दुपारी १.२० वाजता कल्याण, १.४० ठाणे, २.८ मिनिटाला दादर, २.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचणार.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed