• Sun. Mar 8th, 2026

    अंतरवालीतून निघणार, शिवनेरीची माती कपाळी लावणार; जरांगेंची मोठी घोषणा, मुंबई मोर्चाचा प्लॅन सांगितला

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    अंतरवालीतून निघणार, शिवनेरीची माती कपाळी लावणार; जरांगेंची मोठी घोषणा, मुंबई मोर्चाचा प्लॅन सांगितला

    जालना
     मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा करणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. “अंतरवालीतून 27 ऑगस्ट रोजी निघाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे मार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहोत. अंतरवाली सराटी इथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम किल्ले शिवनेरीवर होईल. तेथील माती कपाळी लावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी आपण शिवनेरीहून मुंबईला निघणार आणि 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आपण मुंबईतील आझाद मैदान इथं पोहोचणार आहोत,” असं जरांगे यांनी सांगितलं आहे.उपोषणाबाबत अधिक माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले की, “29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले आमरण उपोषण सुरू होईल. आधी आपण कल्याणवरून जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या मार्गात असणाऱ्या घाटाची आपल्या शिष्टमंडळाने पाहणी केली. घाटात मोठ्या प्रमाणात धुके असून 10 फूट अंतरावरीलही काही दिसत नाही. त्यामुळे आपण वाशीमार्गे मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

    “मुंबईत हजारो रस्ते आहोत, कोणताही एक रस्ता प्रशासनाने आम्हाला द्यावा. लोकांना त्रास व्हावा, अशी आमची इच्छा नाही,” असंही ते म्हणाले.

    नेमक्या मागण्या कोणत्या? जरांगे पाटलांनी सांगितलं…

    1. मराठा आणि कुणबी एकच आहेत, या शासनाने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी.

    2. हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थानचे गॅझेटियर आणि तत्कालीन बॉम्बे गव्हरमेंटचे गॅझेटियर हे तीन गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करा. आता अभ्यास सुरू आहे, हे आम्ही ऐकून घेणार नाही.

    3. सयेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी दीड वर्षांचा वेळ सरकारला दिला, आता आम्ही थांबणार नाही. ज्याची कुणबी नोंद सापडेल, त्याला प्रमाणपत्र द्या, ओबीसींच्या विरोधाकड लक्ष देऊ नका.

    4. मराठा आरक्षणाच्या लढ्यावेळी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतो, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र अजून हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.

    5. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक निधी अजूनही मिळालेला नाही. हे तात्काळ मिळावे.

    दरम्यान, आमच्या मागण्या केल्यास तुम्हा डोक्यावर घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed