• Mon. Mar 9th, 2026

    BMC निवडणुकीआधी फडणवीसांनी डाव टाकला; भाजपकडून मुंबईत नव्या अध्यक्षाची घोषणा

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    BMC निवडणुकीआधी फडणवीसांनी डाव टाकला; भाजपकडून मुंबईत नव्या अध्यक्षाची घोषणा

    BJP Mumbai President: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनेत फेरबदल करत नव्या अध्यक्षांची निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

    मोठी बातमी: BMC निवडणुकीआधी फडणवीसांनी डाव टाकला; भाजपकडून मुंबईत नव्या अध्यक्षाची घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपने संघटनेत खांदेपालट करत नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अमित साटम यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याची माहिती दिली आहे. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मंत्रि‍पदाची जबाबदारी असल्याने पक्षाकडून नव्या अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

    अमित साटम यांच्या निवडीविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आशिष शेलार यांच्याकडे सध्या मंत्रि‍पदाचा भार आहे. त्यामुळे पक्षाने मुंबईत नव्या अध्यक्षांची निवड केली असून अमित साटम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांशी आणि वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून अमित साटम यांची निवड केली आहे. साटम हे मागील तीन टर्मपासून आमदार आहेत, नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. तसंच भाजपमध्ये त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विधानसभेत एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी नवनियुक्त अध्यक्षांचं कौतुक केलं आहे.

    आशिष शेलार काय म्हणाले?

    मुंबई शहराध्यक्षपदी पक्षाने नव्या नेत्याची घोषणा केल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोकणाशी नाळ जोडलेले आणि पक्के मुंबईकर असलेले आमचे मित्र आणि तरुण तडफदार आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी आज निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. नागरी चळवळीतून आलेल्या आणि संघर्ष आणि सेवा हाच ज्याचा ध्यास आहे, अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मला तीन टर्म म्हणजे एकूण नऊ वर्षे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी ही पक्षाने दिली. या काळात पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि तमाम मुंबईकर यांनी मला खूप प्रेम दिलं, सहकार्य केले, लढण्यासाठी ऊर्जा दिली, नवी ओळख दिली आणि जगण्याची एक दिशा दिली. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा