• Sun. Jun 7th, 2026

    Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका

    Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका

    Thane Rain News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील दातिवली भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरात गुडघाभर पाणी असूनही नागरिक घर सोडायल तयार नव्हते. मात्र अग्निशमन दलाकडून १३ जणांना बाहेर काढलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    विनित जांगळे, ठाणे : दोन दिवसांपासून संततधार कोसळणारा पाऊस…घरात गुडघाभर पाणी आणि चाळीला पूर्णपणे पाण्याचा वेढा अशा परिस्थितीतही दिव्यातील दातिवली भागात संतोष नगर परिसरातील रहिवाशांनी घरातच ठाण मांडली होती. घरातून बाहेर पडताच चोरांकडून मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याची भीती या रहिवाशांना सतावत होती. अखेर दिवा प्रभाग समितीचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी या रहिवाशांची समजूत काढून त्यांची सुखरूप सुटका केली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

    दिवा पूर्वेत खाडीपात्रात भरणी करुन मोठ्या प्रमाणात चाळींचे बांधकाम भूमाफियांकडून करण्यात आले आहे. या चाळींमध्ये काही तासांच्या पावसातच पाणी तुंबते. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य पद्धतीने गटार, नाल्यांची व्यवस्था नसल्याने ही समस्या प्रत्येक पावसात समोर येते. अशा पावसात घरात पाणी शिरल्यानंतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताच आजूबाजूला कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत घरातील मौल्यवान वस्तू चोरीला जातात. त्यामुळे स्थानिक घर सोडण्यास नकार देतात. अशीच परिस्थिती मंगळवारी रात्री संतोष नगर येथील नाईकनगर चाळ भागात निर्माण झाली होती. याठिकाणी महिलांसह लहान मुले अडकल्याची माहिती शीळ अग्निशमन केंद्राला मिळाली.
    Maharashtra TimesThane Rain Update : ठाण्यात धुवाधार! गणेशोत्सवाच्या तोंडावर कारखान्यांत पाणीच पाणी, मूर्तींचे प्रचंड नुकसान
    घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह दाखल झाले. मात्र नागरिक घर सोडण्यास तयार नसल्याने शीळ केंद्राचे अग्निशमन अधिकारी स्वप्निल सरनोबत व दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयीन उप अधीक्षक प्रिया मरकड यांनी स्थानिकांची समजूत काढली. त्यानंतर लहान मुले व महिला अशा १३ रहिवाशांना कंबरभर पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    Eknath Shinde | ठाण्यात धो-धो पाऊस, मदतीसाठी स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर, ठाणेकरांना आवाहन

    अनर्थ टळला

    या चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या जीवापेक्षा वस्तूंची अधिक चिंता असते. दरवर्षी पाण्याची पातळी वाढल्यानंतर अशा पद्धतीने घरात उंचीवर अथवा थेट पत्र्यावर जाऊन ठाण मांडतात. मात्र घर सोडण्यास नकार देतात. अखेर अग्निशमन दल व दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवल्याने मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा