Maharashra Weather Update: मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी मंगळवारी रेड अॅलर्ट कायम असून पालघरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने पालघर जिल्ह्यासाठी मंगळवारी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. या क्षेत्राशी निगडीत चक्रीय वातस्थिती या तीव्र कमी दाबाच्या प्रणालीच्या नैर्ऋत्य दिशेला निर्माण झाली आहे. ही स्थिती मंगळवार, १९ ऑगस्टला तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित होईल आणि उत्तर ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून आत येऊन वायव्य दिशेने प्रवास करेल. मान्सूनची द्रोणीय रेषा आता जळगाव, ब्रह्मपुरी या क्षेत्रावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामधून जात आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या गुजरातजवळ हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-पश्चिम वाऱ्यांचा प्रवाह असल्याने महाराष्ट्रामध्ये मान्सून तीव्र असून २१ ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
मोदींचा निर्णय, उमेदवार ठरला अन् अडचणीत उद्धवसेना; 18 वर्षांनी पुन्हा तेच, ठाकरेंसमोर पेच?
सोमवारी मुंबईतील उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत सांताक्रूझ येथे ९९४. मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कुलाबा येथे ३८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे ४५.२ तर सांताक्रूझ येथे १२३.९ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विक्रोळी येथे सकाळपासून सर्वाधिक म्हणजे १३५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल चेंबूर येथे १२४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मुंबईमध्ये पावसाचा जोर दुपारच्या वेळेस काहीसा कमी झाला होता. त्यामुळे पावसामुळे साचलेले पाणी काही प्रमाणात ओसरण्यामध्ये मदत झाली. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या कालावधीत चेंबूर येथे ११७, तर विक्रोळी येथे १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
Mumbai News: घरात हार्ट अटॅक, रुग्णालयात उपचारादरम्यान मुंबई पोलिसाचा मृत्यू, पोलिस विभागात खळबळ
कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर १५ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसत असून, १८ ऑगस्टपर्यंत कुलाबा येथे ३२२.४ तर सांताक्रूझ केंद्रावर ५५३.६ मिलीमीटरचा टप्पा ऑगस्टच्या पावसाने गाठला आहे. सांताक्रूझ येथे पावसाळ्यातील आत्तापर्यंत पावसाने सरासरी ओलांडली असून कुलाबा येथेही पावसाळ्यातील एकूण पाऊस १,२९५ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. कुलाबा येथे सध्या २८४ मिलीमीटर पावसाची तूट आहे मात्र ही तूटही लवकरच भरून निघेल असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. कोकणामध्ये अलिबाग, डहाणू, हर्णे, रत्नागिरी या केंद्रांवर जून, जुलै तसेच ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत पावसाचा जोर फारसा नसल्याने तूट कायम आहे. मुंबई उपनगरे वगळता कोकणातील इतर केंद्रांवर सोमवारी दिवसभरात फारसा पाऊस नोंदला गेला नाही.
अलिबाग येथे ४० तर रत्नागिरी केंद्रावर ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र या केंद्रापलीकडे दुर्गम भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. नद्यांनीही धोक्यांची पातळी ओलांडल्याचे समोर आले.
गोविंदांकडून नियम पायदळी! दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटीहून अधिक दंड वसूल
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाट, पुणे घाट तसेच सातारा घाट परिसरातही मंगळवारसाठी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना बुधवारी ऑरेंज, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अॅलर्ट असेल. त्यानंतर गुरुवारी २१ ऑगस्टला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट म्हणजे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्गाला कोणताही इशारा नाही. घाट भागातील पावसाचा जोरही बुधवारनंतर कमी होईल अशी शक्यता आहे.
पाऊसमान सकाळी ६ ते दुपारी २पर्यंत
(महापालिकेच्या आकडेवारीनुसार) (मिलीमीटरमध्ये)
दादर घनकचरा व्यवस्थापन विभाग – १७३.२
वरळी अग्निशमन दल केंद्र – १७०
वडाळा बी. नाडकर्णी पार्क महापालिका शाळा – १६५
वर्सोवा – १४९ वांद्रे अग्निशमन दल केंद्र – १४५
खार दांडा महापालिका शाळा – १३१ चेंबूर
अग्निशमन दल केंद्र – १७७.२
नूतन विद्या मंदिर – १४७.४
विक्रोळी, टागोरनगर महापालिका शाळा- १४४.२

