• Fri. Mar 6th, 2026
    Thane Rain: ठाणे जिल्ह्यात झोडपणी; ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील सखल भाग जलमय, आज शाळांना सुट्टी

    Thane School Holiday: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघरमध्येही मंगळवारी सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. कसं असेल आजचं हवामान?

    thane school holiday(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    ठाणे: जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाच्या सरींनी झोडपल्याने येथील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना दुपारनंतर घरी सोडण्यात आले. तसेच आज, मंगळवारी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    ठाण्यात घोडबंदर रोड येथून फाउंटनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने सकाळच्या सत्रात वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-नाशिक महामार्ग येथे माणकोली परिसरात पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ठाणे महापालिका क्षेत्रात काही प्रमाणात सखल भागात पाणी साचले. डोंबिवलीतील भागशाळा मैदान, कोपर रोड, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, चक्कीनाका येथे, तर कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहाड, पौर्णिमा चौक यांसह कल्याण रेल्वे पोलिस ठाणे आणि मानपाडा पोलिस ठाण्यात पाणी साचले.
    Maharashtra Timesठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरातील काही भागांत पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण अपडेट्स
    बारवी धरणासोबतच भातसा धरण ओसंडून वाहू लागले असून या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणातून विसर्गाच्या जोडीला पावसाचा जोर वाढल्यास काळू आणि उल्हास नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासन दक्ष आहे.
    Maharashtra Timesशाळेतील मुलांना बोटीतून बाहेर काढलं, कळव्यात पावसाचा हाहा:कार
    जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सविस्तर बैठक झाली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना, विभागांमधील समन्वय, तातडीच्या सेवा उपलब्धतेबाबत तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते. बैठकीदरम्यान अतिवृष्टीमुळे प्रभावित भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बचाव व मदत कार्याची गती, पुनर्वसनाची तयारी, आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा