Ahilyanagar Koaprgaon Gramsevak Ends Life: गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ग्रामसेवकाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाईड नोटच्या आधारे मयत बाजीराव यांची पत्नी प्रमिला बाजीराव बाचकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या विरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने या संदर्भामध्ये बातमीच्या माध्यमातून सर्व घडलेला प्रकार समोर आणला होता. कुटुंबीयांनी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर भास्कर कुटुंबीयांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन दिले होते. सुसाईड नोट मिळाल्यानंतर सोनी पोलिसांनी यावर सखोल तपास करत अखेर 16 ऑगस्ट रोजी दोघा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सोनइ पोलीस करीत आहे.
Crime News : ग्रामसेवकाने राहत्या घरी आयुष्य संपवलं, कुटुंबाचे पंचायत समिती अधिकाऱ्यांवर आरोप, शेवटच्या चिठ्ठीत काय?
रात्रीचा धक्कादायक प्रसंग
8 ऑगस्ट रोजी मध्य रात्री दोनच्या सुमारास बाजीराव बाचकर हे घरातच बेशुद्ध अवस्थेत पडले. बाजीराव यांची पत्नी प्रमिला भास्कर यांना आवाज आल्याने त्यांनी शेजारच्या खोलीत जाऊन बघितलं तर बाजीराव खाली पडलेले दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबीयांनी त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुसाईड नोटमधून समोर आला धक्कादायक प्रकार
10 ऑगस्ट रोजी कागदपत्रे पाहताना बाजीराव यांच्या पत्नीच्या हाताला बाचकर यांनी लिहिलेली चिठ्ठी लागली. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. “विस्तार अधिकारी बबन वाघमोडे आणि गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी माझा सतत मानसिक व आर्थिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने मी जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूस हे दोघेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असे सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
शेवटचे फोन कॉल आणि संभाषण
घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच बाचकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले, पण त्यांनी फोन उचलला नाही. मात्र सहकारी ग्रामसेवकाशी झालेल्या संभाषणात त्यांनी आपल्याला छळ होत असल्याचे सांगत जीव देण्याचा इशाराही दिला होता. या कॉलची रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
“माझ्या पतीला अन्यायकारक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले. या दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी पत्नीने पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत केली आहे. या घटनेने ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दबाव आणि छळाचे अंधारलेले वास्तव पुन्हा समोर आले आहे.

