Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने परिणामी महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भातही १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिह्यांत आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह पुण्यात सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्येही यलो अलर्ट असणार आहे. तर मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात उद्यापासून तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. तर १६ ऑगस्टला मात्र विदर्भातील स्थिती सामान्य असणार आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भातील काही भाग वगळता हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. मात्र १५ ऑगस्टला कोकणातील रत्नागिरीत तर पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात मुसळधार पाऊस असणार आहे. ज्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात १५ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईस, पण १६ ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे साताऱ्यात तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

