Nagpur Accident News: नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणा परिसरात कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला असून रामेश्वर गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, चालक फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रामेश्वर विठ्ठल गावंडे (वय ३०, रा. डिगडोह पांडे, ता. हिंगणा) असं असून तो आपल्या एमएच-४० बीएक्स-७८४१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चौदामैलवरून बाजारगावमार्गे घरी जात होता. दरम्यान, वेदांत ढाब्याजवळ समोरून येणाऱ्या एपी-३० टीसी-२१९२ क्रमांकाच्या कंटेनरने दुभाजकाजवळ अचानक यू-टर्न घेतला. ट्रक चालकाने यू-टर्न घेण्यापूर्वी इंडिकेटर देऊन इशारा न दिल्याने मागून भरधाव वेगाने येत असलेल्या गावंडे यांच्या दुचाकीची ट्रकच्या मागच्या बाजूस जोरदार धडक झाली.
Nagpur Rain : नागपुरात तासभराच्या पावसाने रस्ते जलमय, वाहतूक ठप्प; चेंबर्स ठरतायत डोकेदुखी, महापालिकेचा सुस्त कारभार?
धडकेनंतर गावंडे हे थेट ट्रकच्या चाकांखाली गेल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचंही मोठं नुकसान झालं. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल दीपक कावळे आणि हेमंत उजवणे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स, मिहान येथे पाठवण्यात आला आहे. हिंगणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कारण या रस्त्यावर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. विशेषत: वेगमर्यादा न पाळणे, इंडिकेटरचा वापर न करणे आणि अचानक यू-टर्न घेणे यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिस प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या अपघातामुळे गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात घराचा कर्ता व्यक्ती हरवल्याने नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामेश्वर गावंडे हे स्वभावाने शांत व मदतशील म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसर शोकसागरात बुडाला आहे. हिंगणा पोलिसांनी फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध सुरू केला असून, त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच महामार्गावर वाहतुकीचे काटेकोर नियोजन आणि चालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

