• Mon. Mar 16th, 2026
    उड्डाणे होताहेत बंद, प्रवाशांना फटका… नव्या विमानसेवा सुरू करण्यात प्रशासन ठरले अपयशी

    Nagpur Airport Crisis: नागपूर विमानतळावरून अधिकाधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी असताना, अनेक सेवा बंद झाल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. सिंगापूरसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही, तसेच लखनौ, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, जयपूर या शहरांसाठीची विमानसेवा देखील बंद झाली आहे. आशियान देशांसाठी विमानसेवा सुरू करण्याची प्रतीक्षा कायम आहे.

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकाधिक विमानसेवा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत असताना प्रत्यक्षात येथून वेगवेगळ्या विमानसेवा बंद होताहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

    नागपूर हे शहर मेट्रो सिटी म्हणून वेगाने विकसित होत आहे. नागपूर हे आयटी हब होण्याच्या मार्गावर आहे. या शहराचे महत्त्व लक्षात घेता येथून विविध आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास अनुकूल वातावरण आहे. याबाबत शहरातील विविध औद्योगिक संघटनांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. साधारणपणे वर्षभरापूर्वी तत्कालीन नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे नागपूर येथे आले असता सिंगापूरसाठी नागपूरहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
    Nagpur News: दुचाकी उभी केली, काही वेळ थांबला अन् होमगार्डची उड्डाणपुलावरून उडी, नागपूर हादरलं
    विदर्भाचा आर्थिक विकास साधायचा असेल आणि आयटी क्षेत्राला प्रोत्साहन द्यायचे असेल तर दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठे आर्थिक आणि तंत्रज्ञानाचे हब असलेल्या सिंगापूरमध्ये नागपुरातील व्यावसायिकांना आवागमन करणे सोपे व्हावे, नवकल्पनांची आदान-प्रदान व्हावी आणि उद्योगवृद्धीच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने ही विमानसेवा सुरू करण्यात यावी, याकडे ‘एआयडी’ने लक्ष वेधले होते. त्यावेळी शिंदे यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली होती. पण, त्याचे पुढे काहीही झाले नाही.

    याचप्रमाणे देशांतर्गत विमानसेवा कायम ठेवण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू या शहरांच्या विमानसेवा गेल्या काही वर्षांपासून कायम आहेत. मात्र, याशिवाय लखनौ, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, जयपूर या शहरांच्या विमानसेवा बंद झाल्या आहेत. नोएडा-नागपूरची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. यामुळे नागपूर आणि पर्यायाने विदर्भातील प्रवाशांना याचा बसणार आहे. फटका बसणार आहे.

    Amol Mitakri | कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले तर नक्कीच राजीनामा देतील, मिटकरीं वक्तव्य

    आशियान देशांची प्रतीक्षा कायम

    उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनीदेखील इंडिगो एअरलाइन्ससोबत चर्चा करून आशियान देशांमध्ये आंतरराष्ट्रीय देशांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली होती. आशियान देशांमध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम यांचा समावेश आहे. नव्या उन्हाळी सत्रामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. पण, एकही नवीन आंतरराष्ट्रीय विमान सुरू होणार नसल्याने अजून किती वर्षे नव्या विमानसेवांसाठी प्रतीक्षा करायची, असा सवाल उपस्थित होत आहे.