• Tue. Mar 10th, 2026
    Ratnagiri News: रत्नागिरी पती-पत्नी मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, निलेशची बॉडी सापडली, दोन महिन्यातच संसाराचा शेवट

    Ratnagiri Couple Ends Life: रत्नागिरीत राहणाऱ्या एका जोडप्याने चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. आज पाच दिवसांनी पतीचा मृतेदह सापडून आला आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रत्नागिरी: रत्नागिरीत एका पती-पत्नीने उडी मारून आपल्या आयुष्याची अखेर केल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून उडी मारली. निलेश अहिरे (वय 26) आणि अश्विनी अहिरे (वय 19) अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान, तब्बल पाच दिवसाच्या शोधानंतर निलेश अहिरे याचा मृतदेह दाभोळ जवळील मालदोली खाडीत मिळाला आहे. मात्र, या दोघांनीही जीव का दिला, त्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. या सगळ्याचा शोध चिपळूण पोलीस घेत आहेत.

    निलेश अहिरे (मूळगाव साक्री, जि. धुळे) हा शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आला होता. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. याच ठिकाणी आपली मोबाइल शॉपी सुरू केली. मदतशील स्वभाव असल्याने निलेश अहिरे हे चिपळूणमध्येच स्थायिक झाले. मात्र, या प्रकरणाने त्यांच्या मित्रमंडळालाही धक्का बसला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल, याद्वारे आता चिपळूण पोलिसांकडून या संदर्भात तपास व चौकशी सुरू आहे.
    Ratnagiri News: पुलावर बाईक लावली, धुळ्यातील जोडप्याची कोकणातील वाशिष्ठी नदीत उडी, परिसरात खळबळ
    या मुलाचे लग्न दोन महिन्यापूर्वी झालं होतं. मात्र, हे लग्न मुलाच्या इच्छेविरुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. निलेशची दुचाकी गंधारेश्वर पुलाजवळ मिळाल्याने त्यानेही जीव दिल्याचा संशय आहे. मात्र, या प्रकरणात दोघांचाही शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी अश्विनी हिचा मृतदेह मिळाला होता त्यानंतर आज रविवारी निलेश याचा मृतदेह मिळाला आहे.

    बुधवारी ही घटना चिपळूण शहरात गांधारेश्वर पुलाजवळ घडली. त्यामुळे अवघा जिल्हा हादरला. माहिती मिळताच चिपळूणचे उपविभागीय अधिकारी डॉ. आकाश लिगाडे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र राजमाने, चिपळूणचे पोलीस निरीक्षक नेमाडे आदी सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले.

    एनडीआरएफच्या पथकाने या दोन्ही पती-पत्नीचा शोध घेण्याचं काम सुरू होते. गोवळकोट खाडी परिसरात बोटीने या दोघांचाही शोध घेतला जात आहे. चिपळूण शहरात पाग परिसरात राहणारं हे जोडपं आहे. हे मूळचं उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, निलेश आणि अश्विनी या दोघांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    दोघांचाही नदी पात्रात युद्ध पातळीवर शोध सुरू होता. पत्नी अश्विनीने नदीत उडी घेतल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिने आपले आयुष्य संपवल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे लक्षात येत आहे. तसेच, त्या महिलेला उडी मारताना एकाने पाहिले आहे. त्यानंतरच हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे पोलीस निरीक्षक नेमाडे यांचे पथक तपास करत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा