• Sat. Jun 6th, 2026
    ‘लोकसभेवेळी मंत्र्यांचं खातेवाटप आणि हॉटेलचं बुकिंगही केलं, पण…’ शिंदेंचा विरोधकांवर तिखट शब्दांत वार

    Eknath Shinde Slams Opposition : रत्नागिरीतील खेड येथील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यासोबतच शिंदेंनी विरोधकांवर गंभीर आरोपही केला आहे.

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी प्रयत्न मात्र आम्ही केला आहे. म्हणून कोणी किती आरोप करू देत हा एकनाथ शिंदे कामातून त्याला उत्तर देतो, अशा खोचक शब्दांत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर लोकसभेला तुम्ही सरकार बनवलं होतात इतकंच नाही तर मंत्र्यांचं खात्याचं वाटपही तुम्ही केलं होतं अगदी फाईव्ह स्टार हॉटेलचे बुकिंगही झाले होते, असा आरोपही आता शिंदेंनी केला आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. खेड येथील स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र इमारत नुतनीकरण लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते.

    एकनाथ शिंदे म्हणाले, लोकसभेला सरकार बनवलं, मंत्र्यांच्या खात्याचं वाटपही तुम्ही केलं, हॉटेलचे बुकिंगही झाले होते पण माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी ज्येष्ठांनी सगळ्यांनी हे बुकिंग रद्द करून टाकले. या सगळ्यांनीच विरोधकांना घरचा रस्ता दाखवला. किती भाषा बदलली होती, याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला बर्फाच्या लादीवर झोपवू, अशी भाषा होती. पण अरे झोपवणारे तुम्ही कोण सर्वसामान्य जनतेने तुम्हाला कायमचा झोपवून टाकलं आहे, ते आधी बघा. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
    ‘महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेल’, राज-उद्धव भेटीवर फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया
    व्यासपीठावर असलेल्या रामदास भाईंकडे पाहत एकनाथ शिंदे म्हणाले की, भाई तुम्हालाही भाई म्हणतात मलाही भाई म्हणतात. आपल्या दोघांनाही प्रेमाने लोक भाई म्हणतात. आपण दोघेही भाई आहोत पण ‘हम किसी को छेडते नही लेकिन हमे जो छेडेगा उसको हम छोडते नही ‘ अशी आमची काम करण्याची स्टाईल आहे, असा थेट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला.

    ते पुढे म्हणाले की, कोकणच्या विकासाचे ध्येय आहे. त्यासाठी येथे मोठे प्रकल्प येत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सरकार म्हणून काम करत आहोत. मुंबई ते सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रोड, मुंबई-गोवा सागरी महामार्गबाबत काम सुरु आहे. कोकणातील नऊ खाड्यांवर पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मुंबई-गोवा महामार्ग ही जबाबदारी केंद्राची आहे, पण राज्य म्हणून आपलीही जबाबदारी आहे काही ठेकेदारांमुळे हे काम रखडलं आहे गडकरी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं आहे, ते काम लवकरच पूर्ण होईल, असाही शब्द शिंदेंनी दिला.

    सिंधुरत्न योजना सुरु करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असेही ते यावेळी म्हणाले. खेड येथील माँसाहेबां च्या नावाचे नाट्यगृह हे मुंबईसारख्या शहरातील नाट्यगृहालाही लाजवेल असं कौतुक त्यांनी केलं.

    विरोधकांकडून होणार्‍या आरोपांकडे कडे लक्ष न देता तुमचं काम करत रहा,त्यावरून विचलित होण्याची गरज नाही असं सांगत त्यांनी योगेश कदम यांच्या कामाचे कौतुक केलं.

    नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन

    नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन असे आपले काम आहे. विकासासाठी आपण तात्काळ सही करुन मोकळा होतो व तात्काळ निधी वर्ग होतो. ही आपल्या कामाची पद्धत आहे. दापोली नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed