महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Wireman Dies Of Electric Shock : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 28 वर्षीय गणेश पाटील नामक वायरमनला काम करत असताना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मागे आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा आहे.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील वारूळ गावात गणेश किसन पाटील (वय 28) हे कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत आहेत. गणेश हे घरातील एक कमावता मुलगा आणि आधारस्तंभ होते. आपल्या सात महिन्याच्या लहानग्यासह अगदी आनंदी जीवन ते जगत होते. मात्र नियतीने घात केला आणि विजेचा धक्का लागून गणेश यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या अशा दुर्दैवी निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मंगळवार, 22 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास वारूळ येथील सामाजिक वनीकरण नर्सरी येथे कृषी वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हातात होते. कार्यक्षेत्राबाहेरील या ठिकाणी गणेश पाटील यांना शेती पंपाची वीज दुरुस्त करण्यासाठी पाठवण्यात आले होते. दुरुस्ती दरम्यान 11 हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत पोलवर चढून काम करत असताना त्यांना विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कुटुंबाची बिकट परिस्थिती
गणेश यांच्या पश्चात त्यांची आई-वडील, पत्नी, सात महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता-पुरुष गमावल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लहानग्या बाळाला वडिलांचे छत्र कायमचे हरपल्याने कुटुंबीय आणि गावकरी देखील हळहळले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण वारुळ गावात गणेशला श्रद्धांजली म्हणून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणेश यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कामासाठी का पाठवले? असं म्हणत ‘संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. तर घटनेची नोंद शाहुवाडी पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
महावितरणकडून मदतीची घोषणा
गणेश पाटील यांचा कामाच्या ठिकाणी आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे शाहुवाडी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी.व्ही. कुंभारे यांनी तात्काळ गणेश यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या दीड वर्षापासून गणेश हे महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते. अशा दुर्घटना वारंवार समोर येत असून, कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरक्षित उपाययोजना, प्रशिक्षण व संरक्षण साहित्य पुरवण्याच्या संदर्भात प्रशासन आणि महावितरणवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी शासन व महावितरण यांनी तात्काळ योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
