Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती असल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षावर गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचा आरोप करत त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या वक्तव्यावर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“याचं कारण एकच आहे, गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे, मग त्यामध्ये मोक्काचे असतील, किंवा कुठले आरोपी असतील, ज्यांच्यावर अगदी भाजपनेच दाऊचे साथीदार असल्याचा आरोप केला, इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केल्याचा आरोप केला गेला. दाऊच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागेदोरे होते असे आरोप केले गेले. आमच्याकडे असणाऱ्या काही लोकांबरोबर सलीम कुत्ताचा संबंध जोडला गेला. ही यंत्रणा एकतर तू भाजपात ये नाहीतर तुरुंगात जा यासाठी वापरली जाते. त्यामुळे साहजिकच आहे, लोकं भाजपात जातात. भाजपात गेल्यानंतर त्यांना वॉशिंग पावडरमध्ये घातलं जातं. तिथे राजाश्रय दिला जातो. त्याचा हा दुष्परिणाम आहे. यामुळे महाराष्ट्राच्या नावाला देशातच नाही तर जगात काळीमा फासली आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“केवळ सत्तेच्या लालसेपायी गुन्हेगारांचं राजकीयकरण चाललं आहे. ह्याला मी राजकारण मानायला तयार नाही. आपल्याकडे राजकारण जसा शब्द आहे तसा समाजकारण असाही शब्द आहे. त्याला याला सत्तेचं माजकारण म्हणता येईल. हे माजलेले आहेत. मग ते चड्डी-बनियन गँग असेल, कॅन्टिंगमध्ये बॉक्सिंग करणारे असतील, ह्यांना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरवा ना. गोर गरिबांना बॉक्सिंग करणारे लोकं कोणी माजवली? त्यांना कोणी जाब विचारण्याची हिंमत आहे की नाही? याचं काहीच उत्तर नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
3 हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली
“शेतकरी डोळे लावून बसला होता की, मला हमीभाव मिळेल. एक रुपयाच पीक विमा मिळणार होता. पण ते बंद झालं आहे. त्यावर घोटाळा झाला हे मान्य केलं गेलं. ती योजना रद्द केली गेली. आता नव्या घोटाळ्याची योजना आणली. 3 हजार कोटींची चोरी गायमुख घोडबंदर मार्गात 3 हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली. चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं ते स्पष्ट आहे. तरीही तो चोर शिरजोरगी करुन सर्वत्र फिरत आहे. ह्याला कायदा-सुव्यवस्था सोडून द्या. राज्यकारभारच होत नाहीय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी स्थिती’
“मला तर एकदा असं वाटतंय की, जर विधीमंडळात किंवा विधान भवन परिसरात गुंडागर्दी होत असेल तर या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का? एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असे अनेक गंभीर विषय होते. पण त्या विषयांवर समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून मिळालेलं नाही. त्यामुळे मी त्या भाषणाचा वर्णन स्वप्नरंजन गुटीका असं म्हणतोय. रात्री मुलाने सांगितलं की, मला झोप नाही तर भूक लागली आहे. तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, काळजी करु नको. उद्या उठल्यानंतर तुला आईस्क्रिम देतो. पण आता झोप येत नाही त्याचं काय?”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

