• Sun. Mar 8th, 2026

    भाजप मतदारांची चोरी करुन सत्तेत बसलेला पक्ष, कार्यकर्ते नाहीत म्हणून…, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

    भाजप मतदारांची चोरी करुन सत्तेत बसलेला पक्ष, कार्यकर्ते नाहीत म्हणून…, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

    Harshwardhan Sapkal On BJP: धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहे,’ असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली, तिथे पुणे जिल्हाध्यक्षांचे काय, असा टोलाही त्यांनी या वेळी संजय जगताप यांना लगावला.

    harshwardhan sapkal (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मतदारांची चोरी करून भारतीय जनता पक्ष सत्तेत बसला आहे. या पक्षाकडे छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन म्हणविणारे मुख्यमंत्री असल्याचा दावा त्यांचे नेते करतात. मात्र, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहे,’ असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली, तिथे पुणे जिल्हाध्यक्षांचे काय, असा टोलाही त्यांनी या वेळी संजय जगताप यांना लगावला.

    पुरंदरचे माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी सासवड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेसची तातडीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली.
    Pratap Sarnaik: एसटीत काय चाललंय, हे मलाही कळत नाही! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची उद्विग्नता
    सपकाळ म्हणाले, ‘काँग्रेस देशातील सर्वाधिक जुना आहे. या पक्षाने देशाला राज्यघटना दिली. मात्र, भाजप मतदारांची चोरी करून सत्तेत बसलेला पक्ष आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि ते त्यांच्या नेत्यांना मोठेही करीत नाही. मात्र, अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धाक दाखवून ते त्यांना पक्षात घेत आहेत. काँग्रेस हा नेत्यांचा नव्हे, तर विचारांचा पक्ष आहे.’

    ‘संस्था वाचविण्यासाठी…’
    ‘जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला; म्हणून कोणी जात नाही, तर स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी जातात. ते का गेले, हे तेच सांगू शकतील. सर्व काही मिळाले असताना संस्था वाचविण्यासाठी पक्ष सोडणे, हा संधीसाधूपणा आहे,’ अशी टीका सपकाळ यांनी जगताप यांचे नाव न घेता केली.
    Hemant Godse: गोडसेंचा घरचा आहेर; शिस्त उरली नसल्याची स्वपक्षावर टीका, भाजपात जाण्याची चर्चा
    वैचारिक मांडणी करणाऱ्यांची गळचेपी
    ‘संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांची भेट घेतली. त्या संदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले, ‘राज्यात आणि देशात वैचारिक काम करणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. विवेकवादाची मांडणी करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला. गोविंद पानसरे यांच्याबाबतही हाच प्रकार घडला आणि तोच प्रकार प्रवीण गायकवाड यांच्या बाबतीतही घडला आहे,’ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

    राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. घाशीराम कोतवाल कायदा आणि राज्य चालवीत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत, त्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर आहेत. काही मंत्र्यांना मोहजालात अडकविण्याच्या प्रकाराची ‘एसआयटी’ चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण दडपू नये. – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा