• Sun. Jun 14th, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी असणारे दोन्ही भाऊ कायम सोबत राहणार? बड्या नेत्याची महत्त्वाची प्रतिक्रिया

    महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी असणारे दोन्ही भाऊ कायम सोबत राहणार? बड्या नेत्याची महत्त्वाची प्रतिक्रिया

    Bala Nandgaonkar : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना, मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले. मात्र, यावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले. निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत ज्याला जो अर्थ काढायचा तो काढावा, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी सध्या ठाकरे बंधू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणात एकत्र येण्याची घोषणा केली तर अनेक गोष्टी नव्याने सुरु होणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच भाजप ठाकरे बंधूंचा प्रतिकार कसा करणार? याशिवाय उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे बांधवांचा प्रतिकार कसा करणार? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दोन्ही ठाकरे बांधवांनी एकत्र येत मुंबईत मेळावा घेतला. पण तरीही दोघांच्या राजकीय युतीवर अद्याप शिक्कोमोर्तब झालेलं नाही. त्यामुळे काय होणार? याबाबत सस्पेन्स आहे. याबाबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

    मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आज ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ठाणे आणि माझा खूप वर्षांपासूनचा संबंध आहे. माझा ठाण्याशी ऋणानुबंध आहे. आमच्या ठाण्यातील मंडळींनी मोर्चा काढला होता त्यावेळी मला जाता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं मला अभिनंदन करायचं होतं, कार्यकर्त्यांशी गप्पाही मारायच्या होत्या आणि पूजेला आलो नव्हतो त्यामुळे त्यांना सॉरीदेखील म्हणायचं होतं की, यावेळेला नाही येता आलं पुढच्या वेळी येईन. कार्यकर्त्यांना भेटलो की आनंद वाटतो. मी स्वत:ला कार्यकर्ता समजतो. त्यामुळे मला कार्यकर्त्यांमध्ये राहायला खूप आवडतं. मी कार्यकर्त्यांसोबत मनसोक्त आनंदात असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत आलं पाहिजे”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

    राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना परवानगीशिवाय माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका, असा आदेश दिला आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “प्रवक्ते सोडून इतर नेते विविध माध्यमांवर बोलतात. मुद्दा व्यवस्थित जायला पाहिजे. काही गोष्टींवर आम्ही दुर्लक्ष करतो. काही गोष्टी वेळेवर बोलायला पाहिजेत. कार्यकर्त्यांना या गोष्टी माहिती नसतात. तो आपला व्यक्त असतो. त्यात त्याची चूक नसते. त्याचं राज ठाकरे आणि पक्षावर प्रेम असतं. पण त्यावर आम्हाला नंतर खुलासा करावा लागतो. त्यामुळे राज ठाकरेंनी तसा आदेश दिला”, असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

    “राज ठाकरे स्वत: 18 तारखेला येणार आहेत. 14 ते 16 असं तीन दिवस आमचं इगतपुरीला शिबिर आहे. त्यानंतर 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदरला येणार आहेत”, अशी माहितीदेखील बाळा नांदगावकर यांनी दिली.

    ठाकरे बंधू एकत्र येणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

    “विषय दिला कोणी? आम्ही हिंदीची सक्ती मागितली नव्हती. हिंदीची सक्ती राज्य सरकारने आणली. तो विषय तुम्ही दिला, तर मराठी माणूस पेटून उठणारच आहे. तुम्हाला राज ठाकरे यांचा स्वभाव माहिती आहे. ते मराठीच्या विषयावर कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यामुळे साहजिकच आहे, तो विषय लावून धरला. त्यानंतर सुद्धा त्यांनी हिंदीची सक्ती केली. तो विषय त्यांनी आणला नसता, तर काही घडलंच नसतं. विषय तुम्हीच आणला. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यादिवशीच वक्तव्य केलं की, बाळासाहेबांना जे जमलं नाही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं. त्यांनी धन्यवादही दिले. त्यामुळे त्या विषयाला धरुन आम्ही पुढे निघालो आहोत”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

    “यात निवडणूक हा विषयच नाही. त्याचा तुम्ही जो अर्थ काढाल तो आम्हाला मान्य आहे. तुम्ही निवडणुकीसाठी म्हणा, किंवा मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले म्हणा, तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढा. पण निवडणुका अजून खूप लांब आहे. तुम्ही आताच बोलायला लागलात. ठीक आहे. आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत”, असंदेखील बाळा नांदगावकर म्हणाले.

    “मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी प्रेम टिकवून ठेवायचं की नाही ठेवायचं ते ठरवावं. मी त्यांना विचारलेलं नाही. त्यावर मी भाष्य केलेलं उचित राहणार नाही. वरिष्ठांनी बोललेलं चांगलं असतं. मी कनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी बोलणं उचित नाही”, अशी देखील प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा