उद्धव ठाकरे ऑगस्टमध्ये ‘शिवबंधन परिक्रमा’ काढणार आहेत. मागील निवडणुकीतील पराभवानंतर, ठाकरे गटाला संघटनात्मक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यामुळे पक्षाला मोठे नुकसान झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.
अन् कोकणचा बालेकिल्ला ढासळला
2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे कोकणातील भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर, योगेश कदम, थोरवे, दळवी या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी हे आमदार ठाकरेंसोबत राहिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा पराभव झाला. राजन साळवींनी काही दिवसातच शिवसेना शिंदे गटाची वाट निवडली. महाडच्या उमेदवार स्नेहल जगपात यांनीही घड्याळ हाती बांधले. वैभव नाईक मात्र ठाकरेंसोबत आहेत. एकदंर पक्षाला संघटनात्मक बळ देण्याची नितांत गरज आहे. यासाठीच उद्धव ठाकरेंकडून कोकणात शिवबंधनपरिक्रमेचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे, युती, शिवबंधन परिक्रमा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 19 वर्षानंतर 5 जुलैला व्यासपीठावर एकत्र आले. उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असे स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरेंनी भविष्यातील युतीसंबंधी कोणतेही विधान केले नाही. आणि गेले दोन दिवस राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने नेमकं त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा ठाव लागत नाही आहे. युती झाल्यास ठाकरे ब्रँडची एक लाट निर्माण होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र युती झाली नाही तर मात्र राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असेल. कारण त्यांनी बेधडकपणे शिंदे गटाला आणि भाजपला ललकारले आहे. पुढील निवडणुकांची पुर्वतयारी म्हणून उद्धव ठाकरे पक्षाला शिवबंधन परिक्रमेद्वारे बालेकिल्ल्यात बळ दिले जाईल. पुढील दिवसांत ही परिक्रमा उर्वरित महाराष्ट्रातही काढण्यात येऊ शकते.

