• Sun. Mar 15th, 2026

    जिथे सर्वात मोठं खिंडार, तिथेच ठाकरे शोधणार आधार; बालेकिल्ला मिळवण्यासाठी ‘परिक्रमा’ करणार

    जिथे सर्वात मोठं खिंडार, तिथेच ठाकरे शोधणार आधार; बालेकिल्ला मिळवण्यासाठी ‘परिक्रमा’ करणार

    उद्धव ठाकरे ऑगस्टमध्ये ‘शिवबंधन परिक्रमा’ काढणार आहेत. मागील निवडणुकीतील पराभवानंतर, ठाकरे गटाला संघटनात्मक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यामुळे पक्षाला मोठे नुकसान झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : ज्या भागाने नेहमीच ठाकरेंना साथ दिली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. अशा कोकण विभागात उद्धव ठाकरे येत्या ऑगस्टमध्ये शिवबंधन परिक्रमा काढणार आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी ही परिक्रमा असेल. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. लोकसभेत कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघातील उमेदवारांचा पराभव झाला होता. विधानसभेत तीनही जिल्ह्यातून भास्कर जाधव हे एकमेव आमदार निवडून आले आहेत.

    अन् कोकणचा बालेकिल्ला ढासळला
    2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे कोकणातील भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर, योगेश कदम, थोरवे, दळवी या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी हे आमदार ठाकरेंसोबत राहिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा पराभव झाला. राजन साळवींनी काही दिवसातच शिवसेना शिंदे गटाची वाट निवडली. महाडच्या उमेदवार स्नेहल जगपात यांनीही घड्याळ हाती बांधले. वैभव नाईक मात्र ठाकरेंसोबत आहेत. एकदंर पक्षाला संघटनात्मक बळ देण्याची नितांत गरज आहे. यासाठीच उद्धव ठाकरेंकडून कोकणात शिवबंधनपरिक्रमेचा निर्णय घेतला आहे.

    राज ठाकरे, युती, शिवबंधन परिक्रमा
    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 19 वर्षानंतर 5 जुलैला व्यासपीठावर एकत्र आले. उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असे स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरेंनी भविष्यातील युतीसंबंधी कोणतेही विधान केले नाही. आणि गेले दोन दिवस राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने नेमकं त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा ठाव लागत नाही आहे. युती झाल्यास ठाकरे ब्रँडची एक लाट निर्माण होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र युती झाली नाही तर मात्र राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असेल. कारण त्यांनी बेधडकपणे शिंदे गटाला आणि भाजपला ललकारले आहे. पुढील निवडणुकांची पुर्वतयारी म्हणून उद्धव ठाकरे पक्षाला शिवबंधन परिक्रमेद्वारे बालेकिल्ल्यात बळ दिले जाईल. पुढील दिवसांत ही परिक्रमा उर्वरित महाराष्ट्रातही काढण्यात येऊ शकते.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा