Mumbai Home Allotment Fraud : मुंबईत MMRDAच्या नावाखाली स्वस्त घरांचे आमिष दाखवून दोन महिलांनी अनेक गरीब कुटुंबांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुमारे १५ हून अधिक लोकांकडून दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उकळली आहे.
तक्रारदार महिलेने सांगितले, त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मी बंडे यांनी त्यांना सांगितले की, एमएमआरडीएने बांधलेले घर केवळ आठ लाख रुपयांमध्ये मिळत आहे. यानंतर लक्ष्मीने मीराची भेट नीता सराईकर यांच्याशी करून दिली, जी स्वतःला एमएमआरडीएच्या वतीने झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत सर्वेक्षण करणारी अधिकारी असल्याचे सांगत होती.
Mira- Bhayander : भाईंदर पालिकेची भूमिका संशयास्पद; विकासकाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह
सर्वे करणाऱ्या बोगस महिला अधिकाऱ्यांनी दावा केला की, कुर्ला आणि कांजूरमार्ग परिसरात झोपडपट्टीवासियांसाठी बांधलेल्या घरांमध्ये लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे. स्वस्त दरात घर मिळत आहेत. या लालसेपोटी मीरा कांबळे यांनी आपल्या कुटुंबासाठी चार घरे विकत घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपले सध्याचे घर १२ लाखांत विकले, दागिने गहाण ठेवले, वडिलोपार्जित जमीन विकली आणि पतपेढीकडून कर्जही घेतले होते. अशाप्रकारे आयुष्यभराच्या कमाईची जुळवाजुळव त्यांनी एकूण ३३ लाख रुपये रोख निता सराईकर यांना दिले. पण तीन महिने उलटूनही कांबळेंच्या हाती काहीच लागले नाही.
तीन महिने उलटूनही घराचा ताबा न मिळाल्याने कांबळे यांनी सराईकर यांच्याशी संपर्क साधला. पण त्या वारंवार उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्या. त्यानंतर कांबळे यांना समजले की, त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. तपासात असे समोर आले की, सराईकर आणि लक्ष्मी बंडे यांनी आतापर्यंत सुमारे १५ लोकांकडून दीड ते दोन कोटी रुपये उकळले आहेत. तक्रारीत इतर पीडितांची माहितीही देण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे स्वस्त घरांच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रकाश पडला आहे. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित होते.

