• Fri. Jun 19th, 2026

    ठाकरे नावाचा ब्रँड जर असता, तर बाळासाहेब जिवंत असतानाच…; शिंदेंचे आमदार काय बोलून गेले?

    ठाकरे नावाचा ब्रँड जर असता, तर बाळासाहेब जिवंत असतानाच…; शिंदेंचे आमदार काय बोलून गेले?

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर शिंदेंच्या आमदारांनी प्रतिक्रिया देत ठाकरे ब्रँडवर मोठ विधान केल. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    ऋषिकेश होळीकर, लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज तब्बल 19 वर्षानंतर व्यासपीठावर एकत्र आले आहेत. मनसे, शिवसेना आणि अनेक संघटनांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर हिंद्दी जीआर सरकारला रद्द करावे लागले. यानिमित्तानेच दोन्ही पक्षांकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी भविष्यात एकत्र राहण्याचे संकेतही या मेळाव्यात दिले आहेत. सत्ताधारी पक्षाकडून या मेळाव्यावर टीका केली जात असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

    बाळासाहेब जिवंत असताना…
    आमदार संजय गायकवाड यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले याबाबत विचारले असता, पंधरा वर्षांपूर्वी एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता परंतु त्यांनी फार उशीर केला. आता ते एकत्रित आल्याने महाराष्ट्राला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही.ठाकरे नावाचा ब्रँड जर असता बाळासाहेब जिवंत असतानाच 288 जागा निवडून आले असत्या. त्यावेळीही 70, 74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती.आता हे दोन भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही वेळ निघून गेली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

    तर आपणास उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे
    ते पुढे म्हणाले की, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का, असा सवाल उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा रोखायचा असेल तर आपणास उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे आले असता ते बोलत होते.

    मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे
    हिंदी मराठी वादावर भाष्य करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो कोणी महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे… मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा