उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, ज्याला शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिंदेंनी ठाकरेंच्या ‘उठेगा नही’ या टीकेला त्यांच्या राजकीय अपयशाची आठवण करून देत सडेतोड उत्तर दिलं. तसेच, मराठी भाषेसाठी कोणी तळमळ दाखवली आणि कोणी सत्तेसाठी मळमळ, हे जनतेला समजल्याचं शिंदे म्हणाले.
“मी एवढंच सांगेन, एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. तर दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोकं म्हणत होते. त्यातील एका वक्त्याने ते पथ्य पाळलं. पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. हा फरक आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मराठीबाबत बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं. त्यांचं अभिनंदन. ते राज्यगीत मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली. त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील तुम्ही सोडलं नाही”, असं शिंदे म्हणाले.
‘जळजळ आणि मळमळ होती’
“आजचा मेळावा हा आगपाखड, द्वेष, जळजळ आणि मळमळ होती ते दिसून आलं. आम्ही मराठीसाठी काय केलं, आणि त्यांनी काय केलं? मुंबईचा मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मराठीचा टक्का मुंबईत का घसरला? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हिंदी सक्तीविरोधात मोर्चा, एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी चर्चा करणार, सेना-मनसे युतीवरही प्रतिक्रिया
‘दाढीवरुन पूर्ण हात फिरवला असता तर…’
“दाढीवरुन पूर्ण हात फिरवला असता तर काय झालं असतं ते त्यांना विचारा. फ्लॉवर काय फायर ते पुढच्या निवडणुकीला विचारा”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. “लोकशाहीत कुणालाही कुणाबरोबर युती, आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तशा घटना घडताना दिसतील”, असं सूचक वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.

