• Tue. Mar 10th, 2026
    ‘शिंदे गोंधळलेले, मंत्रीमंडळातील कच्चं मडकं,’ म्हणत राऊतांचे टीकास्त्र; मुख्यमंत्र्यांनाही धरले जबाबदार

    Sanjay Raut Slams Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहांसमोर जय गुजरात चा नारा दिल्याने ते टीकेचे धनी ठरत आहेत. विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. यातच संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळातील कच्चं मडकं म्हणत फटकारलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहांसमोर जय गुजरात चा नारा दिल्याने ते टीकेचे धनी ठरत आहेत. विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा हा अपमान असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. पण यावर एकनाथ शिदेंनीही स्पष्टीकरण दिले आहे की, संबंधित कार्यक्रम हा गुजराती समाजाचा होता. गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे, त्या अनुषंगाने मी ‘जय गुजरात’ म्हटले. शिंदेंच्या या भाष्यावरही आता प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर संजय राऊत प्रत्युत्तर शिंदेंना फटकारले आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळातील कच्चं मडकं म्हणत फटकारलं आहे. तर शिंदे सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे गोंधळले असल्याचे राऊतांनी म्हटले.

    संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळातील कच्चं मडकं आहेत. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीने गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची विधानं होतात. तर टीका होत असल्याने एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरणात म्हटले होते की, ‘गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे,’ या वक्तव्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. ‘आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये आहे? गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता. एकनाथ शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे मराठा संस्था आहे. बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचं राज्य होतं, म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत.’ असे राऊतांनी म्हटले.
    ऐशा नरा मोजूनी…; जय गुजरात म्हणणाऱ्या शिंदेंवर राऊत बरसले; नवं नाव देत शिंदेसेनेचं बारसं
    राऊत पुढे म्हणाले, ‘इंदूर, ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांची मराठी राज्य आहेत. मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की, पेशवे देखील तिकडेच गेले होते. इतिहास मला देखील माहित आहे. योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाही, ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका.’ यासोबतच राऊतांनी शिंदेंना असेही सूचित केले की, ‘तुम्ही महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरं म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देत आहेत.’

    राऊतांनी असेही नमूद केले की, गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामे केली. पारसी समाजाने सुद्धा येथे योगदान दिले आहे. मिस्टर शिंदे तुम्ही असे बोलून मराठी माणसाचा अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या श्रमातून आणि रक्तातून निर्माण झाली आहे. या शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही. यामुळे शिंदेंनी महाराष्ट्राची माफी मागावी. तर एकनाथ शिंदे यांना पाठीशी घातल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबाबत फडणवीस यांनी देखील माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा