• Sun. Mar 8th, 2026
    ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं; भावांनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही – फडणवीस

    Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: हिंदी भाषेच्या सक्तीवरुन राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ माजलेला असताना
    अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतले आहेत. त्यावरुन विरोधकांनी सरकारला आणि फडणवीसांना घेरलं. त्यावर आज त्यांनी उत्तर दिलं आहे.

    देवेंद्र फडणवीस

    मुंबई: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भात काढण्यात आलेले शासन निर्णय (GR) राज्य शासनाने रद्द केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंनी या विषयावर काढलेला मोर्चा रद्द झाला असून, आता ते विजयी मोर्चा काढणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. तसेच, संजय राऊतांनीही सरकारला धारेवर धरले होते. तसेच, दोन भाऊ एकत्र येत आहेत तर तुमच्या पोटात का दुखतंय, असंही म्हटलं होतं.

    ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, आम्हाला फरक पडत नाही – देवेंद्र फडणवीस

    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या जवळच्या नेत्यानेच हिंदी भाषेची सक्ती करण्याची शिफारस केली होती. तसेच, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावे, जेवण करावे, आम्हाला काही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले. Uddhav Thackeray: एक फसला, हा दुसरा डाव; मुख्यमंत्री मराठी भाषाविरोधी, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

    आम्ही पक्षाचं नाही तर विद्यार्थ्यांचं हित पाहणार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊन.”

    ठाकरेंच्या उजवा हात असलेल्या नेत्यानेच हिंदी सक्तीची शिफारस केली होती

    राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने पहिली ती बारावी हिंदी सक्ती करा अशी शिफारस केली होती. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी मंत्रीमंडळात स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे घुमजाव केला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला होता. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे.”

    ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलेला नाही – फडणवीस

    “ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा तर मी जीआर काढलेला नाही. दोन भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवण करावं, काहीही करावं आम्हाला काहीही फरक पडत नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

    “राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही यावर आम्ही एक समिती नेमली आहे. ती समिती आता ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित पाहणार. कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा