• Thu. Jun 11th, 2026

    नागपूरच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला? अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

    नागपूरच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला? अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

    Authored by: चेतन पाटीलContributed by: जितेंद्र खापरे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    Nagpur School : नागपूरमधील दयानंद आर्य कन्या विद्यालयात मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील प्रसिद्ध दयानंद आर्य कन्या विद्यालयात एका मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सोमवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपशील दिला. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले की, “नागपूरातील दयानंद आर्य कन्या विद्यालय या एका शाळेत इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र एका मुस्लिम मुलीला केवळ धार्मिक ओळखीच्या आधारे प्रवेश नाकारण्यात आला, अशी तक्रार अल्पसंख्यांक आयोगाकडे आली होती. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने आम्ही तत्काळ शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशीत हे प्रकरण खरे असल्याचे निष्पन्न झाले आहे.”

    या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते वेद प्रकाश आर्य आणि राजेश ललवाणी यांचे नाव पुढे आले आहे. खान यांनी स्पष्ट केले की, “वेद प्रकाश आर्य हे या शिक्षण संस्थेचे सदस्य असून, त्यांनीच जाणीवपूर्वक मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश न मिळावा यासाठी अडथळा निर्माण केला. इतकेच नव्हे तर त्यांचे मुस्लिम विरोधी वक्तव्यांचे पुरावेही आमच्याकडे आहेत. लवकरच त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली जाणार आहे.”

    या घटनेने नागपूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अल्पसंख्याक आयोगाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या घटनांकडे डोळेझाक केली जाणार नाही. “राज्यात कुठेही अल्पसंख्याक समुदायावर अन्याय झाल्यास आम्ही कठोर कारवाई करू. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक भेदभाव पूर्णपणे असंवैधानिक आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही,” असे खान यांनी ठामपणे सांगितले.

    ते पुढे म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित आहे. त्यानुसार कोणत्याही धर्माच्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची हमी आम्ही देतो. संबंधित शाळा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.” सदर प्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. वेद प्रकाश आर्य यांच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांमध्येही अशी परिस्थिती आहे का, याचीही चौकशी आयोग करणार असल्याचे संकेत प्यारे खान यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून अद्याप काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed