रत्नागिरी-प्रतिनिधी सध्या मे महिन्याच्या सुट्ट्यांचा हंगाम चालू आहे. अनेक जण मुंबईतून कोकणात गावी आले आहेत. गावी आल्यानंतर नदीमध्ये पोहण्याचा मोह आवरत नाही, मात्र पोहताना काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा जीवावर बेतू शकत. अशीच एक दुर्दैवी घटना खेडजवळ घडली आहे. मुंबईवरून बहिणीच्या लग्नासाठी गावी आलेल्या २६ वर्षीय तरुणाचा नदीत पोहताना दुर्देवीरित्या बुडाल्याने मृत्यू झाला आहे. देवेंद्र दिलीप राणे (२६, रा. तुळशी बुद्रुक, ता खेड) असं मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव आहे. खेड येथील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले दिलीप राणे यांचा तो सुपुत्र होता.देवेंद्र हा सीए होता. तो मुंबईत असतो, मात्र बहिणीच्या लग्नासाठी तो गावी आला होता. याच वेळी तो पोहण्यासाठी मित्रांबरोबर नदीवर गेला होता. खेड तालुक्यातील भरणे येथे चोरद नदीपात्रात ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्यांनी दोन वेळा उडी मारुन आनंद घेतला, मात्र तिसऱ्यांदा पोहण्यासाठी मारलेल्या उडीनंतर तो परत वर आलाच नाही. यावेळी पोहण्यासाठी मारलेल्या उडीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेत २६ वर्षीय देवेंद्रचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. देवेंद्र दिलीप राणे (२६, रा. तुळशी बुद्रुक, ता खेड) असं या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होतायावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. देवेंद्र राणे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दापोली मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सायंकाळी उशिरा राणे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करून कुटुंबीयांना धीर दिला.