Beed Crime News : बीड जिल्ह्यात गुन्हेगारी अजूनही थांबलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, परळीत शिवराज दिवटे नावाच्या तरुणाचे अपहरण झाले. त्याला टोकवाडीजवळ नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर मारहाण करणाऱ्या तरुणांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून आज सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचं अपहरण करण्यात आलं. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी तरुणाला निर्घृण मारहाण केली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. अतिशय भीषण अशी मारहाण होत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. पोलीस या प्रकरणात खरंच काय कारवाई करतात? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
कालदेखील अशीच घटना
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात कालदेखील अशीच काहीशी घटना समोर आली होती. बीड येथून एसटी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करुन त्याला अमानुष मारहाण करण्यात आली होती. बीडवरुन अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. यानंतर बस अंबाजोगाई येथे पोहोचताच चार जणांनी विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण केली होती. त्यानंतर आज पुन्हा मारहाणीची घटना समोर आली आहे.

