Kolhapur Airport Renaming News : कोल्हापुरात विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून, मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
काल कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचाही शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला असून यावेळी जिल्ह्यातील नेते व अधिकारी उपस्थित होते. यानंतर विमानतळ संदर्भात बैठक देखील पार पडली या बैठकीत विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण संदर्भात तसेच सध्या सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. भविष्यात विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारपासून विमानतळापर्यंतचा रस्ता चौपदरी करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
काल उद्घाटन झालेल्या ४५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या एटीसी टॉवरमुळे कोल्हापूर विमानतळाला आवश्यक तांत्रिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता, १९०० मीटर असलेली धावपट्टी प्रथम टप्प्यात २३०० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात ही धावपट्टी ३,००० मीटरपर्यंत वाढवण्याचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात आला आहे. आवश्यक ६४ एकरपैकी ६० एकर भूसंपादन पूर्ण झाले असून, उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन धावपट्टीच्या भागातील २८ लाख क्युबिक मीटर खड्डा भरण्यासाठी ३२४ कोटी रुपये निधी लागणार आहे. तसेच, कोल्हापूर विमानतळावर फ्लाइट ट्रेनिंगसाठी एफटीओ (फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई एव्हिएशन सेंटरमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. याशिवाय, विमान देखभाल-दुरुस्ती आणि कार्गो सेवा सुरू करण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे. येत्या काळात कार्गो सेवा आणि तीन हजार मीटर लांब धावपट्टीतून पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केले.
