Amit Thackeray : भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले. या कारवाईवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मोकाट फिरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
“भारतीय सैन्याला हॅट्स ऑफ आहे आम्हा सगळ्यांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे. पण जेवढं दुःख मला पहलगाम हल्ल्यानंतर झालं होतं तेवढा आनंद किंवा समाधान मला आज या कारवाईनंतर झालेलं नाही. कारण हल्ला करणारे अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहेत. ज्या अतिरेक्यांनी 25 निष्पाप पर्यटकांना मारलं ते अजूनही मोकाट फिरत आहेत. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा जे दहा-बारा दहशतवादी मारले जातील”, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली.
“भारताने नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले. पाकिस्तान आपल्याला काय इशारा देणार? जसं मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी बोलले, युद्ध हे उत्तर नाही. ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांना ठेचून मारा. युद्ध हे उत्तर नाही तुम्ही सामान्य लोकांचे बळी कशासाठी घेता? आपल्या सैन्यांना हॅट्स ऑफ कारण त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात. हे अतिरेकी आत आले कसे? हा प्रश्न आपण विचारायला नको का?”, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. दरम्यान, अमित ठाकरे यांनी शिवसेना मनसे-युतीवर बोलणं टाळलं आहे.
