• Sat. Mar 7th, 2026
    ‘ऑपरेशन सिंदूरवर तेवढा आनंद किंवा समाधान नाही’, अमित ठाकरे स्पष्टच बोलले

    Amit Thackeray : भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले. या कारवाईवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मोकाट फिरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : भारतीय सैन्याने पहलगाम येथील हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. एकूण 9 ठिकाणांवरील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानदेखील बिथरला आहे. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना टार्गेट करत त्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाच्या मृत्यू नोंद झालेली नाही. त्यामुळे या हल्ल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय सैन्याच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मागणी केली होती. युद्ध हे त्यावर उत्तर असू शकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. यानंतर आता त्यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

    अमित ठाकरे काय म्हणाले?

    “भारतीय सैन्याला हॅट्स ऑफ आहे आम्हा सगळ्यांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे. पण जेवढं दुःख मला पहलगाम हल्ल्यानंतर झालं होतं तेवढा आनंद किंवा समाधान मला आज या कारवाईनंतर झालेलं नाही. कारण हल्ला करणारे अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहेत. ज्या अतिरेक्यांनी 25 निष्पाप पर्यटकांना मारलं ते अजूनही मोकाट फिरत आहेत. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा जे दहा-बारा दहशतवादी मारले जातील”, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली.

    “भारताने नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले. पाकिस्तान आपल्याला काय इशारा देणार? जसं मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी बोलले, युद्ध हे उत्तर नाही. ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांना ठेचून मारा. युद्ध हे उत्तर नाही तुम्ही सामान्य लोकांचे बळी कशासाठी घेता? आपल्या सैन्यांना हॅट्स ऑफ कारण त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात. हे अतिरेकी आत आले कसे? हा प्रश्न आपण विचारायला नको का?”, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. दरम्यान, अमित ठाकरे यांनी शिवसेना मनसे-युतीवर बोलणं टाळलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed