राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदे दरेगावात असल्यामुळे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू नका’, अशी खंत अजित पवारांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
एकनाथ शिंदे आज दरेगावाच्या दौऱ्यावर आहेत. दरेगावात गाळ मुक्तधरण, गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे दरेगावाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाजूने मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
अजित पवार काय म्हणाले?
“मी एकनाथ शिंदे यांना भेटल्यावर सांगणार आहे की, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. नाही आलं तरी चालेल पण प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रतापवर नाराजी व्यक्त करत नाही. प्रताप तर माझ्या राष्ट्रवादीचाच आहे. आम्ही एकत्र काम करत होतो. पण ज्यांचा सत्कार करायचा ते उपस्थित राहिले नाही. इतरही लोकं म्हणाले असते की, सर आम्ही येत नाही आमचा प्रतिनिधी पाठवतो. शेवटी त्या त्या वेळेस राहिलेल्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे. त्याला त्या त्या व्यक्तीने स्वीकारलं तर त्याला एक आगळंवेगळं महत्त्व आहे. आपण वेगळ्या पद्धतीने या गोष्टी घेतल्या पाहिजेत”, असं अजित पवार म्हणाले.

