• Mon. Mar 16th, 2026

    Ajit Pawar : ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू नका’, अजित पवारांकडून खंत व्यक्त

    Ajit Pawar : ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू नका’, अजित पवारांकडून खंत व्यक्त

    राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदे दरेगावात असल्यामुळे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू नका’, अशी खंत अजित पवारांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महाराष्ट्राच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय माजी मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण न मिळाल्याने ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आज दुपारी समोर आली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती होती. पण ऐन कार्यक्मरात एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपलं भाषण करुन पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. यानंतर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीबाबत खंत व्यक्त केली.

    एकनाथ शिंदे आज दरेगावाच्या दौऱ्यावर आहेत. दरेगावात गाळ मुक्तधरण, गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे दरेगावाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाजूने मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

    अजित पवार काय म्हणाले?

    “मी एकनाथ शिंदे यांना भेटल्यावर सांगणार आहे की, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. नाही आलं तरी चालेल पण प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रतापवर नाराजी व्यक्त करत नाही. प्रताप तर माझ्या राष्ट्रवादीचाच आहे. आम्ही एकत्र काम करत होतो. पण ज्यांचा सत्कार करायचा ते उपस्थित राहिले नाही. इतरही लोकं म्हणाले असते की, सर आम्ही येत नाही आमचा प्रतिनिधी पाठवतो. शेवटी त्या त्या वेळेस राहिलेल्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे. त्याला त्या त्या व्यक्तीने स्वीकारलं तर त्याला एक आगळंवेगळं महत्त्व आहे. आपण वेगळ्या पद्धतीने या गोष्टी घेतल्या पाहिजेत”, असं अजित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed