Sunil Tatkare Reacted On Ajit Pawar Comment on CM : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी २ मे ला मुंबईत आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात बोलताना मुख्यमंत्रीपदावर भाष्य करत मनातील खदखद व्यक्त केली होती. यावर आता खासदार सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे हे मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत आणि आगामी निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेतलेली आहे. मात्र अजित पवार यांनी पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी हे स्वप्न आहे,’ असे तटकरे म्हणाले. तर ‘हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर असे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे,’ असेही तटकरेंनी नमूद केले.
सुनील तटकरेंनी पुढे राष्ट्रवादीचे सत्तेत सहभागी होण्याच्या कारणावर पुन्हा भाष्य केले आहे. ‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन आणि विचारांशी तडजोड न करता आम्ही सत्तेत सहभागी झालो,’ असे तटकरेंनी पुन्हा अधोरेखित केले. ‘लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना वाटलं की, अजित पवार संपले. मात्र आम्हाला विश्वास होता. विधानसभा निवडणुकीत परिमाण वेगळा दिसला. अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा समतोल विकास केला, असे कौतुकोद्गारही काढले.

