• Thu. Mar 12th, 2026
    Naresh Mhaske : ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य

    Naresh Mhaske News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊल उचलली आहेत. शिंदे स्वत: जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणले जात आहे, जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत,’ असे विधान म्हस्के यांनी केले, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    ठाणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत. अनेक नागरीक भयभयीत झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत यायचं आहे. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरला गेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “शिवसेनेच्यावतीने पर्यटकांना आणण्यात येत आहे. जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत”, असं वादग्रस्त वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

    नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?

    “जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता? अहो, 45 लोक रेल्वेने गेले होते. पहलगाममध्ये अडकले. गरीब लोकं, खाण्याचा प्रोब्लेम होता. एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोकं राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ते रेल्वेने गेली होती. ते घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कुरघोडी म्हणताय?”, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. नरेश म्हस्के यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    ‘उपकार केले का तुम्ही?’, सुषमा अंधारे यांचा सवाल

    नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एबीपी माझा’ला प्रत्युत्तर दिलं आहे. “संबंध देश शोकसागरात बुडाले आहेत. सर्वजण दु:खात आहेत, वेगळ्या संवेदनात आहेत तेव्हा सत्ताधाऱ्यांनी भान बाळगलं पाहिजे. मात्र कायम श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेले लोकं आणि कुरघोड्यांच्या राजकारणात असलेले लोक, यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की, त्यापुढे त्यांना लोकांच्या भावना आणि संवेदना याबाबत काहीच वाटत नाही. त्यामुळे या लोकांकडून काय अपेक्षा करायच्या? जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत त्यांना तुम्ही विमानात बसवली म्हणजे उपकार केले का तुम्ही?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *