Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या हल्ल्यात नागपूरचे एक कुटुंब सुदैवाने बचावले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यावर तेथील लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. अनेक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“आम्ही नागपूर महाराष्ट्र येथील आहोत. घटना घडली तेव्हा आम्ही तिथेच होतो. आम्ही एक्झिट गेटवर मॅगी खाल्ली. तिथे प्रत्येक जण एन्जॉय करत होतं. पब्लिक खूप एन्जॉय करत होती. दोन मिनिटात अशी काही घटना घडेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण केवळ दोन मिनिटात हे सगळं घडलं. मी बसलेलो होतो. तेव्हा मला पत्नी बोलली की. चला. मी म्हटलं, आणखी थोडं बसुयात. त पत्नी बोलली नको आता आपण जावूयात. कारण भरपूर वेळेपासून आपण इथे बसलो आहोत”, असं नागपूरहून गेलेल्या पर्यटकाने सांगितलं.
गोळीबार सुरु होताच धावपळ उडाली
“इक्झिट गेट खूप लहान म्हणजे चार फुटाचं आहे. मी घोडेवाल्याला बोलावलं. मी पत्नीला घोड्यावर बसवतो आणि नंतर दुसऱ्या घोड्यावरुन मी जाणार होतो. घोडेवाला घोडा आणणार तेवढ्यात मागून गोळीबाराचा आवाज आला. खूप गोळीबार सुरु होते. त्यामुळे अनेक जण आमच्या दिशेला धावत आली. ते असे धावत होते की, जो कुणी खाली पडले त्याच्या अंगावर पाय ठेवून लोक पुढे पळत होते. मी ते पाहून पत्नीला लवकर पुढे चल असं म्हटलं. मी बाहेरच उभा होतो. तर माझा मुलगा अडकला होता. मी पत्नीला पुढे पाठवलं. पण माझा मुलगा तिथे फसला. मी मुलाचा हात पकडून त्याला बाहेर काढलं. एक मुलगी माझ्यासमोर चिखलात पडली. त्यानंतर तीन-चार लोकांनी तिच्या अंगावर पाय ठेवला. मी तिचे हात पकडत तिला उचललं. मी तिला सांगितलं की, तुम्ही खाली जा”, असं नागपूरच्या पर्यटकाने सांगितलं.
‘दहशतवाद्यांकडे ऑटोमॅटिक हत्यार’
“दहशतवाद्यांकडे ऑटोमॅटिक हत्यार होते. आणि एक व्यक्ती नाही तर ते जास्त होते. कारण एक माणूस एवढं सलग गोळीबार करु शकत नाही. मी पाहिलं नाही, पण माझ्या अनुभवाने सांगतोय. मागे फार मोठी गर्दी होती, असं नागपूरच्या पर्यटकाने सांगितलं. पर्यटकांची संख्या खूप मोठी होती. शेकडो लोक तिथे होते”, असंही ते म्हणाले.
“मी तिथे घोडा घेऊन गेलो होतो. जेव्हा गोळीबार सुरु झाला तेव्हा घोडावाला घोडा सोडून पळून गेला. तो कुठे गेला ते मला माहिती नाही. आम्ही जंगलाचा दिशेला जीव वाचवायला गेलो. या गदारोळात माझ्या पत्नीच्या पायाला दुखापत झाली. तिच्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माबिती मिळत आहे. मी आणि माझ्या मुलाने तिला डोंगरावरुन खाली उतरवलं. अनेक महिला पडल्या. आम्ही काही जणांना मदत केली. आम्ही नदीच्या बाजूने चालत पुढे आलो. आम्ही आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला फोन केला. पण गाडीला इथे येऊ देत नव्हते. आम्हाला भारतीय सैन्याची गाडी मिळाली. त्या गाडीने आम्ही रुग्णालयापर्यंत पोहोचलो”, अशी माहिती नागपूरच्या पर्यटकाने दिली.

