• Mon. Aug 3rd, 2026

    प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षसंवर्धन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2026
    प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षसंवर्धन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. ३ ऑगस्ट  : वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपनही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लावलेली झाडे जिवंत ठेवणे आहे. निसर्ग आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे, फुले, लाकूड आणि प्राणवायू देतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित ‘हरित सांगली’ वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहाय्यक वनसंरक्षक मयुर शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी कौशल्या भोसले, मकरंद देशपांडे, बाळासाहेब व्होनमोरे आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दरवर्षीचे नियोजन आखण्यात आले असून, सांगली जिल्ह्याला सन २०२६ च्या पावसाळ्यात १५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच प्रत्येक सांगलीकर नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असे ते म्हणाले.

    मिरज रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या एक एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत सामंजस्य करार करून ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अटल आनंदवन घनवन विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कमी जागेत अधिक झाडे लावून अल्पावधीत दाट वनराई निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून तीन वर्षांनंतर विकसित केलेला परिसर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धन, प्राणी-पक्ष्यांबद्दल संवेदनशीलता आणि पर्यावरण संरक्षणाचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता व्यक्त केली.

    झाडे जगविण्यासाठी सोप्या आणि परिणामकारक उपायांचाही उल्लेख करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वापरलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना लहान छिद्र करून त्या झाडांच्या मुळाशी ठेवाव्यात. त्यामुळे पाणी हळूहळू थेट मुळांपर्यंत पोहोचून झाडांची वाढ चांगली होते, असे त्यांनी सांगितले. समाजातील अनेक नागरिक स्वतःच्या पुढाकारातून नियमित झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करत असल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थी व युवकांनी सिगारेट, तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनाचा संकल्प करावा, तसेच गुरुजनांचा आणि आई-वडिलांचा आदर करावा, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सामाजिक शिस्त अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड आराखडा फलकाचे फीत कापून व वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सेल्फी पॉइंटचे उद्घाटन त्यांनी स्वतः सेल्फी घेऊन केले. यावेळी राष्ट्रीय हरित सेना ‘पंचतारांकित हरित शाळा’ अंतर्गत विभागीयस्तरीय पुरस्कार प्राप्त मातोश्री गंगाबाई शिवजी कोठारी विद्यालय, सांगली या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed